बुधवारी आणखी पाच वाहनांवर कारवाई
पीएमपी व वाहतूक विभागाकडून खासगी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा धडाका कायम ठेवत काळेवाडी फाटा, जगताप डेअरी, पिंपळे निलख, सांगवी आदी भागात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सहा आसनी रिक्षांवर कारवाई करण्यात आली. दिवसभरात एकूण 5 रिक्षांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक विभागाच्या सहायक निरीक्षक सुप्रिया भोईटे यांनी दिली आहे.
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पीएमपी व वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आल्याने शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर अल्पावधीतच वचक निर्माण झाल्याने बेकायदा प्रवाशी वाहतूक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे त्याचा फायदा थेट पीएमपीला महसूल रुपात होत आहे. पिंपरीतील नेहरुनगर पीएमपी आगाराच्या महसूलात गेल्या 4 दिवसांपासून प्रतिदिन एक लाख रुपयांची वाढ झाली आहे.
शहरातील खासगी अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेल्या 8 दिवसांपासून पीएमपी व वाहतूक पोलिसांकडून संयुक्तपणे मोहिम राबवली जात अ असून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी वाहनांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. यामुळे शहरात पीएमपी बसथांब्यावर खासगी बस किंवा रिक्षा उभे राहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. याशिवाय खासगी बसच्या बहुतांश चालकांनी बेकायदा प्रवाशी वाहतूकच बंद केली आहे. रिक्षांच्या वाहतुकीमध्येही काही प्रमाणात कमी आली आहे. त्यामुहे पीएमपीचे बसथांबे मोकळा श्वास घेत असून पीएमपीतील प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे.
संयुक्त मोहिमेमध्ये बेकायदा प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहणांवर गुन्हे दाखल करून ती थेट कोर्टात सादर केली जात असल्याने अशी वाहतूक करणाऱ्यांमध्ये जरब निर्माण झाली आहे. याचा परिणाम म्हणून पीएमपीचे उत्पन्न मात्र दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नेहरुनगर आगाराचे उत्पन्न गेल्या तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालय, व उन्हाळा सुट्टीमुळे कमी झाले होते. मात्र, कारवाईने जोर धरल्याने अवैध वाहतूक करणाऱ्यांनी पळ काढला आहे. गेल्या चार दिवसांपासून दैनंदिन उत्पन्नात सुमारे एक लाख रुपयांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी नेहरुनगर आगाराचे प्रतिदिन उत्पन्न 7 लाखांपर्यंत होते. ते आता 8 लाख रुपयांवर पोहचले असल्याचे आगार प्रशासनाकडून सांगण्यात
आले आहे.
पीएमपी व वाहतूक पोलीस यांच्याकडून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे पीएमपी चालकांना दिलासा मिळाला आहे. कारवाई सातत्याने सुरू ठेवल्यास निश्चित फायदा होणार आहे. नेहरुनगर आगाराच्या महसुलात या कारवाईमुळे वाढ होत आहे.
विजय रांजणे, आगार प्रमुख, नेहरुनगर आगार