लखनौ -लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेला केंद्रीय मंत्रिपुत्र आशिष मिश्रा याला डेंग्यूची लागण झाली. त्यामुळे त्याला उपचारासाठी रूग्णालयात हलवण्यात आले आहे.
आशिषला पुढील चौकशीसाठी शुक्रवारी सायंकाळी दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत हलवण्यात आले. प्रकृती खालावल्याने शनिवारी रात्री त्याचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले.
त्यामुळे त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरीत काही दिवसांपूर्वी एका वाहनाने चिरडल्याने चार शेतकरी मृत्युमुखी पडले. ते वाहन केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषचे असल्याचे समोर आले. त्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आशिषला अटक केली.
त्या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिपदावरून हकालपट्टी करून मिश्रा यांनाही अटक व्हावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी लावून धरली आहे. ती मागणी पुढे रेटण्यासाठी त्या संघटना 26 ऑक्टोबरला देशव्यापी निदर्शने करणार आहेत.