नवी दिल्ली : शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रकार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठनेते व अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पवार यांनी लखीमपूर नृशंस हत्याकांडावर भाष्य करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यामध्ये ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, लखीमपूरची ही घटना म्हणजे एकप्रकारे जालियानवाला बाग हत्याकांडसारखीच घटना आहे. हे सरकार मुळातच संवेदनशील नाहीये. मात्र, लोक या सरकारला त्यांची जागा दाखवून देतील. अशी पवार यांनी केंद्र सरकार तसेच यूपी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
ज्याप्रकारे शांतीपूर्वक आपला हक्क बजावणाऱ्या शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला त्यातून भारत सरकारची नितीमत्ता स्पष्टपणे दिसून येत आहे. मात्र तुम्ही सत्तेचा वापर शेतकऱ्यांची दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र तुम्ही यशस्वी होणार नाही. याचं उत्तर फक्त पंजाबमधील नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी उत्तर देतील. असेही पवार म्हणाले आहेत.
तिथे संवेदना व्यक्त करायला जाऊ पाहणाऱ्या विरोधकांना रोखले जात आहे. हातातील सत्तेचा गैरवापर करण्याचा हा प्रकार आहे. ज्याचा मी निषेध करतो. मी शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, की तुमच्यावर हा अन्याय होत असला तरीही विरोधक म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्यासाठी तुमच्या मागण्यांसाठी लढू…. असे पवार म्हणाले.