लखनौ – लखीमपूर खेरी शेतकरी हत्या प्रकरणात शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याला 12 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. त्याला आता तीन दिवसांचा पोलीस रिमांड देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या वाहनांच्या ताफ्यात आशिष मिश्रा यांचे वाहन होते, असा आरोप झाल्यानंतर त्यांचे नाव एफआयआरमध्ये घेण्यात आले. हे शेतकरी या भागात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमासमोर निदर्शने करण्यासाठी जमले होते. त्यावेळी मिश्रा यांच्या ताफ्यातील वाहनाने चिरडून चार शेतकऱ्यांची हत्या केल्याचा आरोप होत आहे.
दरम्यान, कॉंग्रेसचे माजी खासदार कै. अखिलेश दास यांचा पुतण्या अंकित दास याचा पोलीस शोध घेत आहेत. वाहनाने शेतकऱ्यांना उडवल्यानंतर त्यातील व्यक्तींना खेचून स्थानिकांनी मारहाण केली. त्यात जखमी झालेली व्यक्ती अंकित दास यांचे नाव घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
त्यावरून पोलिसांनी अंकित दास याला शोधण्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. पोलिस माहानिरीक्षक उपेंद्र कुमार यांनी दिलेल्या महितीनुसार, अंकित दास, शेखर भारती आणि सुमित जैस्वाल यांचा शोध पोलीस घेत आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.
अंकित दास आणि आशिष मिश्रा यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. दोघेही व्यावसायिक आहेत. मात्र, अंकित दास यांची चौकशी केल्यानंतर पूर्ण चित्र उलगडू शकण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसांनी या प्रकरणाचे अनेक व्हिडिओ पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांची तपासणी करून पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. त्याच बरोबर प्राथमिक तपासात हाती आलेल्या पुरावे आशिष मिश्रा समोर ठेवून त्याची उलट तपासणी केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.