लखीमपूर खेरी – लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणामुळे उत्तर प्रदेश सरकार थबकलं. या घटनेत मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई, जखमी झालेल्या शेतकऱ्यांना 10 लाख रुपयांची मदत उत्तर प्रदेश सरकारने सोमवारी जाहीर केली. आता मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीला काँग्रेस धावलं असून काँग्रेसशासित पंजाब आणि छत्तीसगड राज्यांनी मदत देऊ केली आहे.
केंद्रीयमंत्र्यांच्या गाडीखाली चिरडून आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सरचिटनीस प्रियंका गांधी लखीमपूर येथे मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले आहेत.
यावेळी त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल होते. या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. पत्रकारासह मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना पंजाब सरकारकडून प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यात येईल, असं चन्नी यांनी म्हटलं. तर भूपेश बघेल यांनी देखील प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली.