Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभात विलंब झाल्याने महिलांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही गेल्या काही महिन्यांचे अनुदान खात्यात जमा न झाल्याने अनेक लाभार्थी महिलांनी थेट हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक महिलांनी ई-केवायसी अपडेट करून सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली होती. तरीही मागील सुमारे तीन महिन्यांचे मिळून अंदाजे ४,५०० रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याच कारणामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय गाठत अधिकाऱ्यांकडे जाब विचारला आणि योजनेचा हप्ता का थांबवण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला. Ladki Bahin Yojna | या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने महिला एकत्र आल्याने कार्यालयात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ संवाद साधत संबंधित महिलांचे म्हणणे ऐकून घेतले. हिंगोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी महिलांना याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, जोपर्यंत थकीत हप्ते खात्यात जमा होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा ठाम पवित्रा महिलांनी घेतला होता. सुमारे दोन तासांच्या चर्चेनंतर परिस्थिती शांत झाली आणि महिलांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.