लडाख – भारतीय लष्कराने लडाखमध्ये आपले सैन्य हिवाळ्यातही प्रत्यक्ष ताबा रेषेवर सज्ज ठेवणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे. उणे 40 अंशापर्यंत कमी होणाऱ्या तापमानात सैन्याला ठेवण्यासाठी विशेष उपाय योजना करण्यात येत आहेत.
या क्षेत्रात तैनात केलेल्या फौजांची कारवाईची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी भारतीय लष्कराने पायाभूत सुविधांची पूर्तता केली आहे. अतीथंड बोचऱ्या वाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी तातडीने उभारण्यात येणारे निवारे निर्माण केले आहेत. या स्मार्ट कॅंम्पशिवाय तेथे गेल्या वर्षभरात पक्के तळ बांधण्यात आले आहेत. तेथे पाणी, वीज, वातावरण गरम ठेवणारी यंत्रणा, आरोग्य आणि पोषक आहार यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
लष्कराच्या सामरिक नियुक्तीची जागा वगळता अन्य वेळी त्यांना उबदार तंबूत ठेवण्यात येत आहे. तातडीने कोणतीही गरज निर्माण झाल्यास त्यासाठी नागरी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हिम वर्षावापासून वाचवण्यासाठी विशेष निवारे उभारण्याची साधने जागेवर ठेवण्यात आली आहेत, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.
भारत आणि चीनचे लष्कर मे महिन्यापासून एकमेकांपुढे ठाण मांडून बसले आहे. दोन्ही बाजून सुमारे 50 हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. हा तणाव कमी करण्यासाठी लष्करी कमांडर पातळीवरच्या चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या आहेत. दोन्ही बाजूने त्यावर अद्याप समाधानकराक तोडगा निघाला नाही.
नोव्हेंबर महिन्यात लडाखमध्ये सुमारे 40 फूट बर्फवृष्टी होते. हिवाळ्यामध्ये शांततेच्या काळात सामरिक आव्हान उभे राहिले आहे. नेहमीपेक्षा चौपट सैन्य सीमावर्ती भागात तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण युध्दाची यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. भारतीय दलांनी अन्न-धान्य, हिवाळी कपडे, बर्फाच्छादीत भागातील तंबू यांचा पुरेसा साठा केला आहे. हिवाळा सुरू होण्यापुर्वी दोन महिने पुरेल येवढे इंधन ठेवण्यात आले आहे.
गेल्यावर्षी एवढा कडाक्याचा हिवाळा आला तरी त्याला पुरून उरण्यासाठी नियोजन गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. सैन्य आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी हवाई दलाच्या विमानांनी लेह विमान तळावर अनेक फेऱ्या केल्या आहेत. केवळ वाहतूक नव्हे तर लढाऊ विमानांनीही या भागात गस्त वाढवली आहे.
ऑगस्ट महिन्यात भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमालीचा वाढला होता. त्यावेळी हा तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरू झाली. मात्र, तेंव्हा पासूनच हिवाळ्यात सैन्य ठेवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली.