रेडा – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे उत्तम राजकारणी आहेत. पाटील यांची गेली साडेचार ते पाच वर्षे राज्यातील राजकारणात सर्वांनाच उणीव जाणवत आहे. आगामी काळात राज्याच्या राजकारणात त्यांचे पुनरागमन निश्चितपणे होईल, असा विश्वास नीरा-भीमा सहकारी साखर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी व्यक्त केला. दरम्यान, पवार यांच्या वक्तव्यामुळे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर बाण सोडल्याची चर्चा सुरू आहे.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावर हर्षवर्धन पाटील यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर, आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, वृक्षारोपण आदी कार्यक्रम आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले की, हर्षवर्धन पाटील हे राज्यातील अभ्यासू व कार्यक्षम नेते आहेत. राज्यातील राजकारणात त्यांची गरज आहे. राज्याच्या राजकारणात गेली पंचवीस वर्षे उत्कृष्टपणे ते काम करीत आहेत. एक कार्यक्षम नेता म्हणून त्यांना महाराष्ट्र ओळखतो.
यावेळी कारखान्याचे उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे यांची भाषणे झाली. यावेळी रक्तदान शिबिरात 111 जणांनी रक्तदान केले. इंदापूर येथील शहा ब्लड बॅंक यांनी सहकार्य केले. यावेळी संजीवनी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने मधुमेह तपासणी व रक्तदाब तपासणी करण्यात आली. यावेळी वृक्षारोपण, शालेय साहित्यांचे वाटपही करण्यात आले. याप्रसंगी विकास पाटील, अनिल पाटील, धनंजय कोरटकर, तानाजीराव देवकर, मंगेश पाटील, किरण पाटील, महादेव घाडगे, मनोज पाटील, प्रसाद पाटील, सुरेश मेहेर, दत्तात्रय शिर्के, रणजित रणवरे, अजिनाथ बोराडे, प्रतापराव पाटील, प्रल्हाद शेंडे, शंकर घोगरे, दादासाहेब घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, सतीश अनपट, नामदेव किरकत, चंद्रकांत भोसले, शिवाजी हांगे, शिवाजी शिंदे, मोहन गुळवे, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, आत्माराम पवार उपस्थित होते.