लॉकडाऊनचा परिणाम : मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्वेक्षण
पुणे – लॉकडाऊननंतर कामगारांचे स्थलांतर झाल्याने पुण्यातील 30 टक्के उद्योगधंद्यांना त्यांची कमतरता जाणवत आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उत्पादनाची गाडी हळूहळू रुळावर येत असली, तरी त्यामध्ये आणखी वाढ होण्याची गरज आहे. राज्यात आणखी क्रेडिट वाढवण्याची गरज आहे.
या संदर्भात सरकारने काही उपाययोजना राबवण्याची गरज आहे, असे सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. 19 टक्के कंपन्यांनी कामगारांचा कोणताही तुटवडा नसल्याचे सांगितले. तर, 50 टक्के कंपन्यांनी तुटवडा भरून काढला जाणार असल्याचे सांगितले. याशिवाय, 21 टक्के कंपन्यांनी कामगारांचा तुटवडा ही समस्या गंभीर असल्याचे, तर 9 टक्के लोकांनी ही समस्या फार गंभीर असल्याचे नमूद केले.
गेल्या वर्षी मे महिन्याच्या तुलनेत यावर्षी मे महिन्यात फक्त 25 टक्के उद्योग झाला. तर, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये साधारण 37 ते 40 टक्के उद्योग होईल. त्याचबरोबर येत्या काळात 50 टक्क्यांवर वाढत जाण्याचा अंदाज वर्तविला आहे.
लघु, मध्यम उद्योगांसाठी अपुरे कर्ज
केंद्र सरकारकडून लघु मध्यम उद्योगांसाठी तीन लाख कोटींचे कर्ज जाहीर केले. त्यापैकी 75 हजार कोटी रुपये मंजूर झाले. मात्र, महाराष्ट्रात केवळ 4 हजार 150 कोटी मंजूर झाले आहेत. देशाच्या तुलनेत राज्याला 5.5 टक्के एवढे कर्ज मंजूर झाले. देशाच्या तुलनेत राज्याचा जीडीपी 15 ते 16 टक्के आहे. मात्र, त्या तुलनेत हे कर्ज पुरेसे नसल्याचे अहवालात नमूद केले आहे.