मुंबई – देशातील लोकशाही वाचवायची असेल तर यापुढील काळात सर्व निवडणुक ईव्हीएम मशिनऐवजी बॅलेट पेपरवर घेतली जावी, या मागणीसाठी शनिवारी (8 जून) देशभरात सायंकाळी 5 ते 8 या कालावधीत कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. हा कॅन्डल मार्च विविध सामाजिक संघटना, संविधान बचाव समिती, आपच्या वतीने काढण्यात येणार असल्याची माहिती माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी दिली.
2014 मध्ये भाजप सत्तेत आला. त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुकांत भाजपने दमदार व मोठे यश मिळवले. मात्र, यादरम्यान विरोधी पक्षांनी भाजपच्या यशाबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएमबाबतीत विरोधी पक्षांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
ईव्हीएमबाबत राजकीय पक्षांसह काही समाजघटकांनी देशापातळीवर अनेक तक्रारी केल्या आहेत.? या तक्रारी राजकीय पक्षाचे पदाधिकारी, प्रतिनिधी, उमेदवार यांनी केल्या आहेत. आता लोकसभा निकालानंतर काही उमेदवार ईव्हीएमच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत.
जनतेत जागृती निर्माण होण्यासाठी आणि लोकशाहीवरील विश्वास आणखी दृढ होण्यासाठी मतदान हे बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच व्हावे, अशी मागणी पुढे येत आहे. त्यासाठी हा कॅन्डल मार्च आहे, असेही कोळसे-पाटील यांनी सांगितले. मुंबईत आणि राज्यात आप, संविधान बचाव संघर्ष समितीसह इतर सामाजिक संघटना यात सहभागी होणार आहेत.