नवी दिल्ली – आगामी टी20 विश्वचषकानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. यानंतर शास्त्री या पदावर कायम राहण्यासाठी इच्छुक दिसत नाहीत. यामुळे शास्त्रीनंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण असेल? याची चर्चा रंगत आहे. अशातच आता अशी माहिती सामोर येत आहे की, बीसीसीआय या पदासाठी अनिल कुंबळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या नावाचा विचार करत आहे.
याबाबत बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली आहे. तो म्हणाला, अनिल कुंबळे ज्याप्रकारे बाहेर गेले होते त्यामध्ये आता सुधार करण्याची गरज आहे. ज्याप्रकारे कोहलीच्या दबावात येऊन सीओकेने त्यांना हटवले, ते एक चांगले उदाहरण नव्हते. असे असले तरीही, हे कुंबळे आणि लक्ष्मणवरही अवलंबून असेल की, ते या पदासाठी अर्ज करू इच्छितात की नाही?
बीसीसीआय या दोघांना प्रशिक्षकपदासाठी अर्ज करायला लावू शकते. यापूर्वी कुंबळे 2016 मध्ये भारतीय संघाचा प्रशिक्षक झाला होता. पण विराटसोबत त्यांचे संबंध खराब झाल्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. पण आता असे सांगितले जात आहे की, कुंबळेंचे नाव मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी सर्वात पुढे आहे. पण लक्ष्मणच्या नावावरही विचार केला जाऊ शकतो. लक्ष्मण आयपीएल संघ सनरायझर्स हैदराबादचा मार्गदर्शक आहे. त्याच्याकडे खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा चांगला अनुभवही आहे.
दरम्यान, रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षक असताना भारतीय संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. संघाने फक्त मायदेशातच नाही तर विदेशातही अनेक सामने आणि मालिका जिंकल्या आहेत. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 2 कसोटी मालिकेत त्यांच्याच देशात हरवले आहे. तसेच यावर्षी इंग्लंविरुद्धच्या कसोटी मालिकेतही भारतीय संघाने चांगेल प्रदर्शन केले आहे.