भारतीय संघात क्रिकेटच्या तीनही प्रकारात यजुवेंद्र चहलबरोबर कुलदीप यादवही दाखल झाला तेव्हा हरभजनसिंग व अनिल कुंबळे यांचे पर्याय मिळाले असे वाटत होते. मात्र, कालांतराने आज हे दोघेही कधीतरी संघात दिसतात. त्यामानाने चहलला जास्त संधी मिळते पण कुलदीपला संघात स्थानही मिळत नाही. हे का घडले याचे उत्तर शोधले तर असे लक्षात येते की माजी कर्णधार विराट कोहलीच्या मर्जीतील जे काही खेळाडू आहेत त्यांना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघातून डच्चू मिळत असावा.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील लढतीत कुलदीप यादवने टाकलेल्या ड्रीम चेंडूची चर्चा रंगली व तेव्हाच विचार आला की या मेहनती व गुणी गोलंदाजाला संघात सातत्याने जागा का दिली जात नाही. सातत्याने त्याच्यावरच हा अन्याय का होत आहे. या सामन्यात कुलदीपने गुजरात टायन्सच्या विजय शंकरला ज्या चेंडूवर बाद केले ते पाहून फिरकी सम्राट शेन वॉर्नलाही हेवा वाटला असता. इतकेच नव्हे तर हा चेंडू पाहून आकाशातून देखील त्याने आश्चर्य व्यक्त केले असेल.
1993 साली ऍशेस कसोटी मालिकेत वॉर्नने इंग्लंडच्या माइक गेटिंगला ज्या चेंडूवर बाद केले होते तो चेंडू शतकातील सर्वोत्तम ठरला होता. कुलदीपने टाकलेला चेंडूही त्याच दर्जाचा व गुणवत्तेचा होता. कुलदीपने ज्या चेंडूवर शंकरला बाद केले तो चेंडू कुलदीपच्या कारकीर्दीतील सर्वात श्रेष्ठ चेंडू ठरेल यात शंका नाही. पण त्याचवेळी प्रश्न पडतो की जर इतक्या मोठ्या क्षमतेचा हा गोलंदाज आहे तर त्याला भारताच्या संघातून बाहेर का ठेवले जाते. कानपूरमध्ये जन्मलेला हा 28 वर्षांचा गोलंदाज क्षमता असूनही डावलला का जातो.
8 कसोटींत 26 बळी, 65 एकदिवसीय सामन्यांत शंभरपेक्षाही जास्त बळी व टी-20 क्रिकेटमध्ये 24 सामन्यांत 41 तर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 47 सामन्यांतून 44 बळी ही त्याची कामगिरी आहे. इथे बळींची संख्या कमी दिसत असली तरीही त्याने ज्या परिस्थितीत हे बळी मिळवले ते संघाच्या विजयात अत्यंत मोलाचे ठरले आहेत हे विसरता कामा नयेत.
यंदाच्या वर्षी त्याने वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय तर श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामना खेळला होता, त्यानंतरही त्याचे संघातील स्थान कायम राहीले नाही. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये सातशेपेक्षा जास्त बळी घेऊनही त्याचे संघातील स्थान निश्चित नाही याचे आश्चर्य वाटते.
कर्णधार कोणीही असो कुलदीपसारखे बीग फिश हंटर गोलंदाज संघात असलेच पाहिजेत. आता यंदाच्या आयपीएल
स्पर्धेत त्याची कामगिरी कशी होते त्यावरच त्याची संघातील निवड अवलंबून असावी, कर्णधाराच्या पसंतीवर नव्हे.