इंदौर – ऑस्ट्रेलियात या वर्षी ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. क्रिकेटच्या या महाभारतात भारतीय संघाकडून प्रसीध कृष्ण हा एक नवीनच गोलंदाज रंगत आणेल व संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलेल असे खुद्द भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वर्तविले आहे.
पाठीच्या दुखापतीतून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पूर्ण तंदुरुस्त झाला आहे. शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी या नव्या गोलंदाजांनीही सरस कामगिरी केली आहे तरी देखील कोहलीने एका उदयोन्मुख गोलंदाजामुळे विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला लाभ होणार असल्याचे संकेत दिले. कर्नाटकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा वेगवान गोलंदाज प्रसीध कृष्ण याचा उल्लेख करून कोहलीने त्याच्या गोलंदाजीची ऑस्ट्रेलियात निश्चितच वाहवा होईल असा विश्वासही त्याने व्यक्त
केला आहे.
कृष्णने आजवरच्या कारकिर्दीत लिस्ट ए च्या 41 सामन्यांमध्ये 67 बळी घेतले आहेत. प्रथम श्रेणीच्या 6 सामन्यात 20 गडी बाद केले आहेत. त्याने सौराष्ट्रविरुद्ध रणजी पदार्पण करत या सामन्यात 19 धावांच्या मोबदल्यात 5 गडी बाद केले होते. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर संघाकडून खेळताना त्याने 18 सामन्यात 14 गडी बाद केले आहेत. त्याची प्रत्यक्ष सामन्यातील अचूक गोलंदाजी पाहूनच कोहली प्रभावित झाला आहे, त्यामुळेच तो कृष्णच्या निवडीबाबत आग्रही आहे, अर्थात कोहलीच्या मताला निवड समिती कसा प्रतिसाद देते हे महत्त्वाचे ठरणार आहे.