बेल्हे (प्रतिनिधी) :- खरीप हंगामाची शेतकऱ्यांनी सोयाबीन के.एस. एल. ४४१ या वानाची पेरणी केली होती. परंतु बियाणे उतरले नाही म्हणुन तालुका कृषिअधिकारी सतीश शिरसाठ यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. यामध्ये शिवाजी आहेर (रा.अणे) रोहिदास शिंदे (शिंदेवाडी),भानुदास शिंदे (शिंदे वाडी) पांडुरंग दाते (अणे) अंजनाबाई शिंदे (शिंदेवाडी) तसेच तालुक्यातील आर्वी, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, घोगरेवाडी, कोंबरवाडी,नळवणे,निरगुडे, आगर, गोळेगाव अशा गावातील ३२ शेतकऱ्यांनी तालुकास्तरावर ती निवारण समितीकडे तक्रारी केल्या होत्या.
तालुका कृषिअधिकारी यांनी त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून कृषिधन प्रा.लि. कंपनीला कळविले व ताबडतोप शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून दुबार पेरणीसाठी देण्यात यावे यासाठी पाठपुरावा केला. परंतु कंपनीने तालुका कृषि अधिकारी शिरसाठ यांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही.
अखेर शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी तालुका कृषिअधिकारी सतीश शिरसाठ यांनी गुरुवार (दि.२) रोजी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये कृषिधन कंपनी विरोधात भा. द. वि. ४२० सह कलम बियाणे कायदा १९६६ कलम ६ बी, ७ बी, बियाणे नियम १९६८ कलम २३ ए (२) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.