माधव विद्वांस
संसदेमध्ये मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो व इंग्रजांचे राजवटीत दीड हजार गावांत प्रतिसरकार चालविणारे क्रांतिसिंह नाना रामचंद्र पाटील यांची आज जयंती.त्यांचे गाव सांगली जिल्ह्यातील येडेमछिंद्र.त्यांचा जन्म आजोळी बहेबोरगाव येथे 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ त्यांनी तलाठ्याची नोकरी केली. नोकरी सोडून स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांनी राजकीय व सामाजिक कार्य सुरू केले. तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा, हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा व चालीरीती यांविरुद्ध त्यांनी ग्रामीण भागातून दौरे काढून लोकमत जागृत केले.
1930 साली म. गांधींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत ते सहभागी झाले. पुढे महाराष्ट्र कॉंग्रेस कमिटीवर ते निवडून आले होते. सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यांनी सातारा, सांगली व कोल्हापूर भागात प्रतिसरकार स्थापन करून समांतर शासनव्यवस्था उभी केली. गावपातळीवर संघटना उभ्या करून गावांतील प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्यपुरवठा, बाजारव्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे सोडविण्यास सुरुवात केली. प्रामुख्याने गावातील सावकार, समाजकंटक यांच्यावरही वचक बसविला. “तुफानी सेना’या नावाखाली त्यांनी स्वतंत्र सेनाही स्थापन केली. या सेनेमार्फत ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट तसेच खजिन्यावर हल्ले करून सरकारला खुले आव्हान देऊन शासनव्यवस्था नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरित्या राबवले. लाड यांचेकडे प्रतिसरकारचे सर्वाधिकार होते.
कविवर्य ग. दि. माडगूळकर यांनी रचलेले पोवाडे शाहीर निकम आपल्या खास ढंगातून गावोगावी सादर करून प्रतिसरकारचा कार्यप्रचार लोकांपुढे करीत असत. “गांधी विवाह’ (कमी खर्चातील विवाह) ही संकल्पना त्यांनी आणली. तसेच त्यांनी शिक्षणप्रसार, ग्रंथालय स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती यासाठी ग्रामीण भागात प्रबोधन केले.
नाना पाटलांच्या “प्रतिसरकार’ला लोक “पत्रीसरकार’ही म्हणत. कारण नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत, अशा वदंता त्यावेळी प्रचलित होत्या. 1920 ते 1942 या काळात नाना पाटील यांना 8-10 वेळा तुरुंगवास पत्करावा लागला. वर्ष 1942 ते 46 या काळात ते भूमिगतच होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर त्यांनी कॉंग्रेसबरोबर फारकत घेऊन डाव्या विचारसरणीच्या कम्युनिस्ट चळवळीत प्रवेश केला. शेतकरी कामगार पक्षातही ते सक्रिय झाले. 1957 च्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले. 1967च्या निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. त्यांचे निधन 6 डिसेंबर 1976 रोजी मिरज येथे झाले. क्रांतिसिंहांना अभिवादन.