मुंबई : राज्यात सध्या समीर वानखेडे हे क्रूज पार्टी प्रकरणाने चांगलेच चर्चेत आले आहे. त्यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून वेगवेगळे आरोप देखील लावण्यात आले आहे. त्यामुळे एनसीबीच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत. या सर्वांमध्ये आता शिवसेनेने उडी घेतली आहे. तसेच एनसीबीच्या प्रकरणामध्ये अभिनेत्री क्रांती रेडकर यांचा काय संबंध म्हणत शिवसेनेकडून सवाल उपस्थित करण्यात आले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एनसीबी, समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरवर आपले मत मांडले. यावेळी बोलताना त्यांनी, क्रांती रेडकर मराठी मुलगी आहे. तिच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. पण एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं महाराष्ट्रातील मराठी लोकांना त्रास देत आहेत, असाही गंभीर आरोप केला.
पुढे बोलताना संजय राऊत यांनी “एनसीबी प्रकरणात क्रांती रेडकरचा संबंध काय? ही लढाई एनसीबी आणि इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकरवर व्यक्तिगत कुणी टीका टीपण्णी केलीय असं मला वाटत नाही. मी तसं पाहिलं नाही. महाराष्ट्रात ईडी, सीबीआय, एनसीबीचे अधिकारी बाहेरून येऊन इथं आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. त्रास देण्यात येणारे लोक मराठीच आहेत ना. ते काय अमराठी आहेत का?” असा सवाल केला आहे.
“दिल्लीतून तपास यंत्रणांचं आक्रमण सुरू आहे. कारण नसताना मानगुटीवर बसण्याचा प्रयत्न होतोय. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. धाडी पडत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर देगलूरला धाडी पडल्यात. अशोक चव्हाण, अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथं मराठी तर सगळेच आहेत,” असे मत संजय राऊत यांनी मांडले आहे. तसेच “प्रश्न मराठी अमराठी असण्याचा नाही, सत्य असत्याचा आहे. क्रांतीवर अन्याय होणार नाही. पण केंद्राच्या यंत्रणा राज्यात ज्या प्रकारे मागे लागल्यात व त्यानंतर आता ज्या गोष्टी समोर आल्यात त्यामुळे सगळ्यांना घाम फुटायला लागलाय,” असा दावा देखील त्यांनी केला आहे.
“क्रांती रेडकर विषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी आज नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तिच बाळासाहेबांच्या विचाराची आहे. हे ठाकरे सरकार आहे. शरद पवारही आहेत. सर्व व्यवस्थित आहे. इथं कुणावरही अन्याय होणार नाही,” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.