पाटण -कोयना पाणलोट क्षेत्रात बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरणातील पाण्याची आवक कमी झाल्याने पाच फुटांवर असणारे धरणाचे दरवाजे बुधवारी सकाळी दोन फुटांवर स्थिर करण्यात आले. सहा वक्र दरवाजांमधून 18100 तर पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक असा 20200 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे.
कोयना धरणातील पाणीसाठा 103.51 टीएमसी झाला आहे. तर पाणी पातळी 2162.2 फूट झाली आहे. धरणातील पाण्याची आवक कमी झाली असून धरणात 20 हजार 200 क्युसेक पाणी येत आहे. 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण सध्या पूर्ण क्षमतेने भरले आहे. यावर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडल्याने नवजा व महाबळेश्वर या ठिकाणी पावसाने पाच हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे कमी कालावधीत धरणातील पाणीसाठा वाढला आहे.
15 ऑगस्टपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची डेडलाईन असते. मात्र, 30 जुलैनंतर पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने धरणातील पाण्याची आवक कमी झाली होती. पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ न झाल्याने धरण शंभर टक्के भरण्यासाठी वीस दिवसांचा उशीर झाला. कोयना धरणातील सध्याच्या पाणीसाठ्यामुळे सिंचन तसेच राज्यातील विजेची चिंता मिटली आहे. आतापर्यंत कोयना 4189, नवजा 5492 व महाबळेश्वर 5559 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.