पाटण -कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. पावसाने रविवारी सायंकाळपासून विश्रांती घेतल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे.परिणामी 23 जुलैपासून धरणाच्या सहा वक्र दरवाजातून सोडण्यात येणारे पाणी बुधवारी सकाळी बंद करण्यात आले. दरम्यान, 13 दिवसांत धरणातून तब्बल 36.88 टीएमसी पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला असल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापनाने दिली.
धरणातील आजचा पाणीसाठा 86.48 टीएमसी झाला असून पाणी पातळी 2148.5 फूट झाली आहे. धरणात पाण्याची आवक प्रतिसेकंद 43 हजार 489 क्युसेक आहे. तर धरणाचे सहा वक्र दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले असून पायथा वीजगृहातून 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात जुलैअखेर विक्रमी वाढ झाली. 21 व 22 जुलै सायंकाळपर्यंत कोयना धरणात तब्बल 16 टीएमसी पाण्याची आवक झाल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून पाणी नदी पात्रात विसर्ग करण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला.
यादरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद 1 लाख 50 हजार क्यूसेक वर पोचली होते. त्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय 21 जुलै रोजी घेण्यात आला. 21 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत धरणातून 36.88 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 1 जून ते 4 ऑगस्टपर्यंत 8.46 टीएमसी पाण्याचा वापर करण्यात आला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक घटली आहे. पाणलोट क्षेत्रात सध्या तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत असून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात उदभवणारी पूरपरिस्थिती विचारात घेऊन कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापकानुसार 24 तासांतील व कंसामध्ये आतापर्यंतचा एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोयना 32 (3310) नवजा 51 (4231) महाबळेश्वर 30 (4303).