कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग : धोम, कण्हेरमध्ये समाधानकारक
सातारा/पाटण – जिल्ह्याच्या पश्चिमेला पावसाची धुवॉंधार बॅटींग सुरू असून परिणामी धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत कोयनेचा पाणीसाठा 84 टीएमसीपर्यंत पोहचला होता. दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात येणारी पाण्याची आवक मोठी होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
दरम्यान, जुलै महिन्यात आणि ऑगस्टच्या सुरूवातीच्या दोन दिवसामध्ये ही दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे पश्चिमेच्या सर्वच धरणांचा एकूण सरासरी पाणीसाठा 80 टेक्क् पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत धोममध्ये 9.78 टीएमसी, कण्हेरमध्ये 9.40 टीएमसी, बलकवडीमध्ये 3.56 टीएमसी, उरमोडीमध्ये 7.39 टीएमसी तर तारळीमध्ये 5.19 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
तर कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या सात दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली आहे. धरणात आजअखेर 84 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरणात तब्बल 46 हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. 26 जुलै पासून कोयनाधरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. कोयना, नवजा व महाबळेश्वर याठिकाणी सरासरी 250 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद दररोज होत आहे. त्यामुळे ओढे, नाले यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक धरणात होत आहे. तर महाबळेश्वर याठिकाणी गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे झपाट्याने कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
सध्या धरणातील पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून पाणी सोडण्यात येत आहे. मात्र पायथा वीजगृहातील विसर्गाला मर्यादा असल्याने धरणाच्या सहा वक्र दरवाजातून पाणी सोडावे लागणार आहे. पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस व धरणात येणारे पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्याही क्षणी धरणाच्या सहा वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.
कोयना नदीकाठच्या गावांना याची पूर्व कल्पना दिली आहे. तर धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, आजअखेर कोयना धरणातील पाणीपातळी 2190 फूट झाली असून उंची 671.125 मिलीमीटर झाली आहे.तर गेल्या चौवीस तासात कोयना 182 मिलीमीटर, नवजा 218 मिलीमीटर तर महाबळेश्वर 332 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पाटण तालुक्यात डोंगर खचला
मेढोशी, ता. पाटण येथील गावाच्या बाजूस असणाऱ्या बोर्गेवाडी या गावच्यावरीलबाजूस असणारा डोंगर खचला आहे. 31 जुलै रोजी रात्री घटना घडून गावची पाहणी करण्यासाठी कोणीही विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे अथवा तहसिलदार रामहरी भोसले हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असणारे अधिकारी याठिकाणी पोहचले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले. आमच्या जीवीतास धोका असून शासनाने आमची दखल घेतली नाही तर तहसिल कार्यालयात तळ ठोकू असा इशारा दिला आहे. गेल्या वीस वर्षापासून बार्गेवाडीच्या पुर्नवसानाचा प्रश्न रखडला आहे. स्थानिक पातळीवर कोणताही अधिकारी आमची दखल घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमची दखल घेत नसाल तर तहसिल कार्यालयात राहुट्या उभारु, असाही इशारा ग्रामस्थांनी दिला.