मंचर (प्रतिनिधी) – करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर धोका पत्करून कोविड योद्धांचे काम अंगणवाडी सेविका, मदतनीस, कर्मचारी करीत आहेत; परंतु त्यांना एप्रिल महिन्यापासून मानधन न मिळाल्याने त्यांची अवस्था काम करूनही हाती पैसा नाही, अशी झाली आहे. शासनाने अंगणवाडी सेविका, मदतनीसांचे मानधन वेळेवर होण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका अंगणवाडी सभेच्या अध्यक्षा कलावती पोटकुले यांनी केली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचारी कोविड योद्धांचे काम करीत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसमावेत अंगणवाडी मदतनीस, सेविका आणि आशा स्वयंसेविका मदत करीत आहेत; परंतु एप्रिलपासूनचे त्यांना मानधन मिळालेले नाही. एक हजार रुपयांचे मासिक विशेष मानधनही ग्रामपंचायतीतर्फे एकदाच मिळाले, त्यामुळे कर्मचाऱ्यांची अवस्था काम करूनही हाती पैसा नाही, अशी झाली आहे. अंगणवाडीसेविका, मदतनीस वाड्या-वस्त्यांवर रोज घरोघर जाऊन करोना रुग्णांबाबत माहिती घेत आहेत.
परगावाहून आलेले, तसेच मुंबई, पुणे येथून आलेल्या नागरिकांची माहिती ग्रामपंचायत पातळीवर पोहोचविण्याचे काम करीत आहेत. काम करीत असताना त्यांना वादावादी, शिवीगाळ आदी प्रकारांना सामोरे जावे लागले. शहरातून आलेल्यांना घरी थांबवण्यास सांगण्यासाठी अंगणवाडीसेविका, मदतनीसांना घरोघरी जावे लागते आहे. अंगणवाडीतील मुलांना आणि मातांना पोषण आहार घरोघर पोहोचविण्याचे कामही सेविकांना करावे लागते.
तुटपुंज्या मानधनासाठी अंगणवाडीची नोकरी सोडण्याचा दबाव कुटुंबीयांकडून होत असल्याचे काही अंगणवाडी सेविकांनी सांगितले आहे. मात्र, सर्व प्रकारचा धोका पत्करून अंगणवाडी कर्मचारी काम करीत असताना त्यांना मानधन वेळेत दिले पाहिजे, अशी मागणी आंबेगाव तालुका अंगणवाडी सभेच्या अध्यक्षा कलावती पोटकुले यांनी केली आहे.