नवी दिल्ली – देशाच्या कोविड मृत्यु दरात आणखी घट होत तो आता 2. 25 टक्के इतका झाला आहे. जागतिक स्तरावर सर्वात कमी मृत्युदर असणाऱ्या देशांमध्ये असलेले स्थान भारताने कायम राखले आहे.
प्रतिबंधात्मक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, अधिकाधिक कोविड चाचण्या, सर्वांगीण वैद्यकीय उपचार सेवेवर आधारित वैद्यकीय व्यवस्थापन नियमावली, रुग्णालय यंत्रणांवरचा ताण कमी करण्यासाठी लक्षणविरहीत रुग्णांसाठी वैद्यकीय देखरेखेखाली गृह अलगीकरण या सर्वांचा सकारात्मक परिणाम म्हणून मृत्युदर सतत कमी होत आहे. जूनच्या मध्यावर 3.33 टक्के असलेला हा मृत्यदर आज 2.25 टक्के इतका झाला आहे.
तीन स्तरीय आरोग्य सुविधा आणि रुग्ण व्यवस्थापन यामुळे रुग्ण बरे होण्याचा दरही सातत्याने सुधारत आहे. प्रतिदिन 30 हजार पेक्षा जास्त रुग्ण बरे होण्याचा आजचा सलग पाचवा दिवस आहे. केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नांचा रोख हा अधिकाधिक कोविड चाचण्या करून लवकरात लवकर बाधित रुग्ण शोधणे आणि त्यांचे विलगीकरण करून त्वरित वैद्यकीय व्यवस्थापन करण्यावर आहे. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर जूनच्या मध्यावर 53 टक्के होता तो आज 64 टक्क्यांहून अधिक झाला आहे. गेल्या 24 तासात 35,पेक्षा अधिक रुग्ण बरे झाले असून यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 9 लाख 52 हजार 743 इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सुधारणा होत असल्यामुळे सक्रिय रुग्ण आणि बरे होणारे रुग्ण यांच्यातील तफावत देखील वाढते आहे. सध्या हा फरक 4 लाख 55 हजार 755 इतका आहे. म्हणजेच सध्या 4 लाख 96 हजार 988 इतके सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.