आज शुक्रवारी महाशिवरात्र. त्यानिमित्ताने अशा महादेव मंदिरांची वैशिष्ट्ये आणि माहिती खास “प्रभात’च्या वाचकांसाठी….
बारा मोटेच्या विहिरीमुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असणारे शेरी लिंब हे गाव आणखी एका कारणामुळे प्रसिद्ध आहे, ते म्हणजे गावातून वाहणाऱ्या कृष्णा नदी पात्रातील खडकावर असलेल्या कोटेश्वर महादेव मंदिरामुळे. अठराव्या शतकातील पेशव्यांचे सरदार नारो आप्पाजी खिरे (तुळशीबागवाले) (इ.स.1700-1775) हे शेरी लिंब गावचे.
त्यांनी पुण्यातील तुळशीबाग आणि राम मंदिर उभारले. त्याच पद्धतीने कोटेश्वर शिवमंदिर आपल्या लिंब गावात उभारले. कृष्णा नदीच्या पात्रात असलेल्या खडकामुळे नदीच पात्र दोन भागात विभागलेले आहे. नदीवर बांधलेल्या पुलावरुन थेट मंदिरापर्यंत जाता येते.
प्रथम एक छोटे गणपतीचे मंदिर आहे. त्याच्यापुढे मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाला पार बांधलेला आहे. या पाराच्या खालच्या बाजूला बनवलेल्या खोबण्यात वेगवेगळ्या मूर्ती ठेवलेल्या आहेत. प्रवेशव्दारासमोर उभे राहिल्यावर उजव्या हाताला नदीच्या पात्रापासून वरपर्यंत दगडी तट बांधून काढला आहे. या तटात बनवलेल्या खोबणीत गणपतीची मूर्ती व शिवलिंग आहे. नदीच्या तटाबाजूच्या पात्रात उतरण्यासाठी पायऱ्या (घाट) बांधण्यात आला आहे. साताऱ्यातून पंधरा किलोमीटर अंतरावर कोटेश्वर मंदिर आहे. थेट मंदिरापर्यंत वाहनाने जाण्याची सोय आहे.