कोपरगाव (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील पाणीपुरी गाडी, बेकरी, पान टपरी, चहा स्टॉल, उपहारगृहे, ज्यूस सेंटर, नाश्ता सेंटर, मंगल कार्यालये व आठवडे बाजारासह इतर गर्दी होणारी सर्व कार्यालये हे पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवावेत, असे आदेश मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिले आहे. तालुक्यातील सर्व सामुदायिक प्रार्थनास्थळे, छोटे उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांना दिले आहेत.
करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रशांत सरोदे व तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. शहरवासीयांना सोशल मीडियाद्वारे या पत्राची प्रत मिळाली असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात रोगप्रतिबंधक कायदा 1897 लागू करून त्याच्या तरतुदी निर्गमित केल्या आहेत.
त्यानुसार ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आलेले आहेत. नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी विविध अस्थापना पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवावेत, असे आदेश दिले आहेत. मंगल कार्यालयात कोणतेही सामाजिक, संस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांना परवानगी देऊ नये. अन्यथा भारतीय दंड संहितेनुसार शिक्षेस पात्र अपराध केला, असे मानण्यात येईल. त्यानुसार संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.शाळा, खासगी कार्यालये बंद आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व गर्दीचे ठिकाणे व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देताच तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी, सुनील गोर्डे, पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर, नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष योगेश बागूल, आरोग्य विभागाचे सभापती अनिल आव्हाड, बापू आरण यांच्यासह पालिक, महसूल, पोलीस विभागाच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी शहरात दुकाने बंद केल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांची एकच धावपळ शहरात सुरू झाली. अत्यावश्यक सेवा मात्र यादरम्यान सुरू असणार आहेत.
तळिरामांची दारू दुकानांवर झुंबड
दारूची दुकाने बंद होणार, हे समजताच तळीरामांनी वाईन शॉप, देशीदारूच्या दुकानांवर मद्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली. पोलीस अधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष यांच्या ताफ्या समक्ष तळीरामांनी मद्याच्या बाटल्या नको त्या जागी लपवत होते, तर काही दारूच्या बाटल्यांचे बॉक्सच्या बॉक्स घेवून पळापळ करीत होते. त्यांची गंमत नगराध्यक्षांसह नागरिक पाहात होते.