जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचा नागरिकांशी संवाद
शिक्रापूर (वार्ताहर) – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील परिसरातील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर आहे. भाविकांना भौतिक सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासनसह स्थानिक नागरिकांनी सामाजिक बांधीलकीतून गतवर्षी केलेल्या कामामुळे कोरेगाव भीमाकरांनी पुणे जिल्ह्याचा कलंक पुसण्याचे काम केले आहे. परिसरात कोणताही अनूचित प्रकार घडू देणार नाही, असा ठाम विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुख-सुविधांची पाहणी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी कोरेगाव भीमा व पेरणे याठिकाणी जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक जयंत मीना, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, ऐश्वर्या शर्मा, तहसीलदार लैला शेख, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, विठ्ठल ढेरंगे, पी. के. गव्हाणे, कैलास सोनवणे, अनिल काशिद, कोरेगाव भीमाच्या सरपंच संगीता कांबळे, पेरणेचे सरपंच रुपेश ठोंबरे, उपसरपंच प्रकाश ढेरंगे, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी व्यथा मांडताना दि. 1 व 2 जानेवारी 2017 रोजी झालेल्या दंगलीत झालेल्या नुकसानीची नागरिकांना संरक्षक देण्याची मागणी करीत स्थानिक तरुणांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. कोरेगाव भीमाच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची केली. गावासाठी शुद्ध पाणी प्रकल्प, संपूर्ण गावात सीसीटीव्ही बसविणे आदी समस्या मांडण्यात आल्या. यावेळी एक जानेवारी रोजी मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या बांधवांचे गुलाबपुष्प व पाणी देवून स्वागत करणार असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, मानवंदनेसाठी येणाऱ्या बांधवासांठी 15 ठिकाणी पार्किंग, 230 बसने अंतर्गत वाहतूक, 330 शुद्ध पिण्याचे पाण्याचे टॅंकर, 10 किलोमीटर अंतरावरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेऱ्यांसह ड्रोन कॅमेऱ्याने विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अग्निशमन, रुग्णवाहिका यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गतवर्षीपेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त असून सर्वाधिक पोलीस बंदोबस्त कोरेगावात आहेत. प्रशासनाने चांगली तयारी केली असल्याचे सांगत स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेची हमी प्रशासनावर आहे.
मटका बंद कधी होणार, आजीबाईंचा सवाल
कोरेगाव भीमा येथे मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू आहे. दारुची दुकाने रात्री उशीरापर्यंत सुरू असतात. मटक्यावर तात्पुरती कारवाई होऊन लगेचच पुन्हा मटका सुरू होतो. हे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने अशा धंद्यांवर कारवाई होणार कधी, असा खडा सवाल प्रियदर्शनी महिला मंडळाच्या 70 वर्षीय अध्यक्षा सुमन ढेरंगे यांनी उपस्थित केला. त्यांची दखल तात्काळ जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतली आहे. यावर शिक्रापूर पोलीस काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विकास आराखडा अंतिम टप्प्यात
पेरणे, कोरेगाव भीमा व वढू बुद्रुक परिसराचा 68 कोटी रुपयांचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. कोरेगाव भीमाच्या शुद्ध पाणी प्रकल्पासाठीचा प्रस्ताव तात्काळ बनविण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जानेवारी महिन्यातील डीपीडीसीच्या बैठकीत मंजूर करण्याचे आश्वासन देत इतर योजनांसाठीही मोठा निधी मिळवून देऊ, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.