कोपरगाव – कोपरगाव तालुक्यात करोनामुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने रूग्णांना व नातेवायीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. मात्र गेल्या वर्षभरा पासून या मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोपरगाव तालुक्यात एक रुपयाची कोणाला मदत केली नाही.
जिवघेण्या संकटाच्या या काळात नागरीकांनी साधी रुग्णवाहिका मागितली तरी त्यांनी वर्षभरापासून दिली नाही. सध्या करोनाने उद्रेक केला. उपचार घेण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत,ऑक्सिजन चा पुरवठा अपुरा पडतोय, उपचारा अभावी माणसांचा मृत्यु होत असल्याने वैतागलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी कृष्णाई मंगल कार्यालयाच्या बाहेर खासदार सदाशिव लोखंडे यांना घेराव घालुन मदत करण्याची विनंती केली.
खासदार यांनी उडवाउडवीचे उत्तर देताच मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष गंगवाल यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांनी खासदार लोखंडे यांचे खाली वाकुन पाय धरत म्हणाले की, साहेब उपचारा अभावी कोपरगावचे नागरीक मरत आहेत त्यांना जाळण्यासाठी किमान लाकडे तरी द्या. आता अंतिमसंस्कार करण्यासाठी लाकडांची कमतरता भासु लागली आहे.
नागरीकांना करोनातुन वाचविण्यासाठी जरी तुम्ही मदत करीत नसाल तरी किमान जाळण्याकरीता लाकडांची मदत करा अन्यथा आम्हाला विष तरी द्या म्हणजे करोनाने बेहाल होवून मरण्यापेक्षा तुमच्या मदतीच्या विषाने मेलेले बरे अशी मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड व दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल यांनी करताच खासदार लोखंडे आवाक झाले.
याच दरम्यान माजी आमदार स्नेहलता कोल्हे आल्या त्यांनीही खासदार लोखंडे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडून नागरीकांना या संकटकाळात आरोग्यहितासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. व्याकुळतेने मनसेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीने उपस्थित सर्वजन गोंधळून गेले.
दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव येथे करोना आढावा बैठक घेतली या बैठकीला खासदार लोखंडे आले होते. बैठक संपल्या नंतर ते बाहेर आल्यानंतर मनसेच्या कार्यकत्यांनी आपली कैफियत लोखंडे यांच्यासमोर मांडले.
यावेळी संतोष गंगवाल बोलताना पुढे म्हणाले की, कोपरगावच्या जनतेनी खासदार सदाशिव लोखंडे यांना दोनवेळा भरघोस मताने खासदार केले. त्यांनी कोपरगावच्या जनतेला कसलीच मदत केली नाही. गेल्या एक वर्षापासून तालुक्यातील जनता करोनाच्या महासंकटाने होरपळत असताना लोखंडे यांनी कसलीच मदत केली नसल्याची खंत व्यक्त केली.अखेर डोळ्यातून आश्रु ढाळत बोलण्याची वेळ आली अशी खंत त्यांनी व्यक्त केली.