-शंकर दुपारगुडे
कोपरगाव(प्रतिनिधी) – करोनाच्या महामारीने संपूर्ण जग हादरले. त्याचा परिणाम आपल्या देशावर झाला. करोना संसर्गजन्य विषाणुची लागण अनेक शहरातील नागरीकांना झाल्याने. सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले. त्याचा फटका सर्वसामान्य मजुर,कामगारांना बसल्याने विविध राज्यातील कामगार आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई व पुणे येथे परप्रांतीय मजुरांची संख्या सर्वाधिक आहे. या भागातुन अनेक मजूरांच्या टोळ्या आपल्या गावाकडे जाण्यासाठी हजारो किलोमिटर पायीच चालत निघाल्या. काहींना गाड्याची व्यवस्था झाली, काहींनी वैयक्तिक गाड्या करून प्रवास सुरू केला.
प्रवासा दरम्यान रस्त्याच्यावर खाण्या पिण्यासाठी कुठेच व्यवस्था नव्हती किंवा हॉटेल उघडे नाहीत. करोनामुळे मुंबई- पुणे व इतर शहरातुन व्यक्ती आला असे समजले तरी त्या त्या गावातील नागरीक संशयीत नजरेने त्यांच्याकडे बघत होते. मदत करणे लांबच पण निट कोणी बोलत नव्हते . अशा वातावरणात परप्रांतीय नागरीक महामार्गाने आपला प्रवास बिगर अन्न पाण्याविना करीत होते.
या गरजू नागरीकांच्या आत्म्याची जाण कोपरगावकरांनी जाणली आणि पायी व गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोफत जेवण देण्याचे महान कार्य सुरू केले. ९ ते १७ मे या दरम्यान नगर-मनमाड महामार्गावर पायी जाणारे व गाड्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना २४ तास अन्नदान मोफत देवून माणुसकीचे दर्शन घडविले.
रस्त्याने चालून चालून भुकेने व्याकुळ झालेल्या प्रवाशांना कोपरगावमध्ये आल्यानंतर दोन घास माणुसकीचे खायला मिळत होते. भुकेने व्याकुळ झालेल्या जीवांना सोनतारा भन्साळी ट्रस्ट, सन्मती इंडस्ट्रीज, गोदावरी इक्किपमेंट प्रा.लि., भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समुह, मनोज कांतीलाल अग्रवाल, सी.एन.कातकडे यांच्यावतीने मोफत भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
आठ दिवसात तब्बल २१ हजार गरजू प्रवाशांना या मोफत भोजनाचा लाभ मिळाला. पहाटे पासुन २४ तास ही भोजन व्यवस्था कोपरगाव शहरातील महामार्गाशेजारी करण्यात आली होती. शहरातील काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकते पायी जाणाऱ्या प्रवाशांना जेवणाचे पॅकेट देवून सहकार्य केली. अनेक प्रवाशांनी जेवणाचे पाकीटे पुढच्या प्रवात खाण्यासाठी सोबत घेवून गेले.
कोठेही गाजावाजा नाही मदत करणाऱ्यांचा कोठेही फोटो नाहीत. प्रसिद्धीसाठी नाही तर गरजुंच्या मदतीसाठी माणुसकीच्या भावनेतून अन्नदानाची मदत करून पुण्याचे कार्य केल्याने अनेक प्रवाशांनी कोपरगाकरांची व या प्रमुख पाच दानशुरांप्रति समाधान व्यक्त केले. जेवणाच्या पाकीटा बरोबर फळे, दूध,पाण्याच्या बाटल्या यांचाही समावेश होता. त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्याने कोठे काहीच मिळाले नाही ते कोपरगावकरांनी दिले.
करोनाच्या संकटाचा समाना करताना रस्त्याने भुकेचा सामना करण्याची वेळ आलेल्या नागरीकांना देवदूतासरखी मदत करणारे कोपरगावचे हे पंच रत्न अनमोल वाटत होते. या मदतीच्या माध्यमातून कोपरगाव वरून जाणारा प्रवाशी भविष्यात कोपरगावच्या या माणुसकीला कधीच विसरणार अशी सेवा प्रवाशांची केली.
सोनतारा भन्साळी ट्रस्टचे संजय भन्साळी,अरविंद भन्साळी, भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समूहाचे मुनीश ठोळे, राजेश ठोळे,सन्मती इंडस्ट्रीजचे रविंद्र ठोळे,गोदावरी इक्किपमेंट.प्रा.लि.चे भाऊसाहेब काळवाघे, मनोज अग्रवाल, सी.एन.कातकडे यांच्या सामाजीक कार्याची महती अनोखी आहे. त्यांना या उपक्रमात जयभोले ग्रुप, मुंबादवी तरूण मंडळ,जैन समाजाच्या स्वयंसेवकांनी या कार्यात सहकार्य केले.
दरम्यान जैन, शिख समाज तसेच संतोष गंगवाल व मित्र परिवारांनी पायी जाणाऱ्या व गाड्याने जाणाऱ्या प्रवाशांना मोफत चहा पाणी ची मोफत व्यलस्था केली होती . लहान मुलांना पिण्यासाठी दुध वाटप करून अनोख्या मानुसकीचे दर्शन घडविले. पुणतांबा चौफुली ते टाकळी फाटा या शहराच्या हद्दी परिसरातील महामार्गावर कोपरगाकरांनी हजारो प्रवाशांना विविध प्रकारची मदत करुन माणसातल्या देवाचे दर्शन घडविले आहे.