मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून खटल्यात दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींनी शिक्षेविरोधात औरंगाबाद खंडपीठासमोर दाखल केलेली याचिका मुंबई खंडपीठाकडे वर्ग करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. या खटल्यातील दोषी आरोपी नितीन गोपीनाथ भैलूमे याने खटला वर्ग करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी हा निर्णय दिला.
कोपर्डीतील 15 वर्षे वयाच्या शालेय मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या घटनेचे तीन वर्षांपूर्वी राज्यभर पडसाद उमटले होते. त्यानंतर गावालगतच्याच वस्त्यांवर राहणारे जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (25), संतोष गोरख भवाळ (30) व नितीन गोपीचंद भैलुमे (26) या तिघा आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या आरोपींना कट रचून मुलीवर अत्याचार करणे, तिचा खून करणे, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार 18 नोव्हेंबरला 2017 ला तिघा आरोपींना दोषी ठरवून 29 नोव्हेंबरला फाशीची शिक्षा ठोठावली. या शिक्षेविरोधात आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर अपील दाखल केले. तर राज्य सरकारने फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी याचिका दाखल केली.
हा खटला औरंगाबाद खंडपीठासमोर असताना या खटल्यातील आरोपी नितीन गोपीनाथ भैलूमे याने खटला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठासमोर वर्ग करण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. या याचिकेची मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी दखल घेत खटला मुंबई खंडपीठाकडे वर्ग करण्याचे आदेश दिले.