कोलकाता – देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या संबंधात पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना काही कानमंत्र दिले आहेत. निर्मला सीतारामन यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारने आत्तापर्यंत केवळ पुरवठा वाढीकडेच लक्ष दिले पण बाजारात मागणीच नसल्याने केंद्र सरकारचे हे प्रयत्न अपयशी ठरले आहेत, त्यातून अर्थ व्यवस्थेला कोणतेच बळ मिळालेले नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता सप्लाय साईडकडील आपले लक्ष कमी करून डिमांड साईडकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच सरकारने देशातील मागणी कशी वाढेल याचा विचार केला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहित देशातील गुंतवणूक 2 लाख 10 हजार कोटींनी कमी झाली आहे असे अमित मित्रा यांनी त्यांच्या निदर्शनाला आणून दिले आहे. केंद्र सरकारने अनेक पॅकेजस जाहीर करूनही देशातील गुंतणूक वाढू शकलेली नाही ही चिंतेची बाब आहे असे त्यांनी म्हटले आहे. सध्याच्या बिकट आर्थिक स्थितीचा बोजा देशातील गरीब व मध्यमवर्गीयांवर पडत असून त्यांच्यावरील हा बोजा येत्या काही काळात आणखी वाढणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी 20.1 टक्क्यांनी वाढला असल्याचे सांगितले जात असले तरी तो आकडा हा गेल्यावर्षीच्या याच तिमाहीच्या आकड्याशी निगडीत आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते जून या तिमाहीत उणे 24.4 टक्के इतका जीडीपी होता. त्यात ही 20.1 टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात असले तरी या तिमाहीचा खरा जीडीपी अजून उणे चार टक्के इतकाच आहे असेही सांगितले जात आहे. त्यामुळे जीडीपीत मोठी वाढ झाली असा दावा करून जो गदारोळ माजवला जात आहे त्यावर नियंत्रण आणले जावे अशी सुचनाही त्यांनी केली आहे.
प्रचंड प्रमाणात वाढलेली बेरोजगारी, मजुरांचे सुरू असलेले रिव्हर्स मायग्रेशन, खासगी कंझम्पशनची पडझड, वाढत्या महगाईने गरीबांची झालेली मोठी परवड आणि त्यांच्याकडून खरेदीवर अत्यल्प होणारा खर्च त्यातून कंझम्पशन कोसळणे ही अर्थव्यवस्थेच्या दूरवस्थेची मुख्य कारणे आहेत त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे अमित मित्रा यांनी निर्मला सीतारामन यांना कळवले आहे.
ऑगस्ट महिन्यात बेरोजगारीचा दर पुन्हा 8.32 टक्क्यांवर गेला आहे हे देशासाठी धक्कादायक आहे, याचा अर्थ देशातील 3 कोटी 60 लाख लोकांनी रोजगार गमावला आहे असा होतो याकडेही त्यांनी सीमारामन यांचे लक्ष वेधले आहे. सन 2019,2020 या वर्षात देशातील जवळपास अर्धे नोकरदार कर्मचारी नोकऱ्या गमाऊन बसले असून त्यांना आता अन्य प्रकाराचे काम करून रोजीरोटी कमवावी लागत आहे असेही मित्रा यांचे म्हणणे आहे. शहरातील नोकऱ्या गेल्याने हजारो लोक पुन्हा शेतीच्या कामाकडे वळणे हे अर्थव्यवस्थेच्या भीषणतेचे लक्षण आहे असेही त्यांनी म्हटले आहे.