कोल्हापूर – करवीर निवासिनी श्री अंबाबाई…. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेली कोल्हापूरची अंबाबाई ही लाखो भाविकांची आराध्य दैवत… 305 वर्षांपूर्वी म्हणजे इसवी सन 1715 मध्ये मोगलाईच्या काळात अनेक देवळे उद्धवस्त करण्यात आली. तसेच मूर्ती विटंबनाच्या काही ठिकाणी घटना घडल्या. त्याकाळी अंबाबाई मंदिरात असा प्रकार होऊ नये म्हणून पुजारी आणि भाविकांनी मूर्ती भीतीपोठी मंदिराजवळ असलेल्या कपिलतीर्थ येथे पुजाऱ्याच्या घरी लपवून ठेवली. त्यानंतर 26 सप्टेंबर 1715 रोजी नरहरभट सावगावकर यांना झालेल्या दृष्टांन्ताप्रमाणे करवीर संस्थानंचे छत्रपती संभाजी दुसरे यांच्या आज्ञेने सिदोजी घोरपडे (गजेंद्रगडकर) यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीची पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापना केली. तो आजचा हा दिवस (26 सप्टेंबर). या ऐतिहासिक घटनेला आज 305 वर्षे पूर्ण झाली आहेत.
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि विशेष आहे. विशेषतः करवीर निवासिनीच्या भक्तांनी आवर्जुन साजरा करावा असा सण. 26 सप्टेंबर 1715 ला मोगलाईच्या काळात आक्रमकांपासून् लपवून श्रीपूजकांच्या घरी लपवलेली श्री अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान झाली तो हा दिवस. 1710 मध्ये श्रीमन्महाराणी ताराराणी सरकारांनी करवीर संस्थानची स्थापना केली. त्यानंतर 1715 साली नरहरभट सावगावकर यांना देवीचा दृष्टांत झाला की, आता मला पुन्हा सिंहासनावर विराजमान करा. त्यांनी हा दृष्टांत पन्हाळगडावर श्रीमन्महाराज शंभू छत्रपती (दुसरे) यांना विदित केला. हुजुरस्वारीच्या हुकुमावरून श्रीमंत सिदोजी घोरपडे सरकार यांनी 26 सप्टेंबर 1715 रोजी विजया दशमीच्या दिवशी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची मूर्ती पुन्हा मंदिरात विराजमान केली.
करोना संकटामुळे भव्य दिव्य नसला तरी साधेपणाने सुंदर सोहळा मंदिरात आज पार पडला. या निमित्ताने श्रीमंत यशराज घोरपडे यांच्या हस्ते अभिषेक झाला. त्यानंतर देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, एन. डी. जाधव यांच्या हस्ते घोरपडे सरकार यांचे प्रतिनिधी श्रीमंत यशराज घोरपडे गजेंद्रगडकर सरकार, सावगावकर प्रधान यांचे प्रतिनिधी विशाल प्रधान, श्रीपूजक प्रतिनिधी माधव मुनीश्वर, शिरीष मुनीश्वर यांचा सन्मान करण्यात आला. यानिमित्ताने करवीरनिवासिनीची सालंकृत विशेष पूजा बांधून संपूर्ण मंदिर फुलांनी व रांगोळ्यांनी सजवण्यात आले आहे.