पूरस्थितीमुळे तब्बल 400 फेऱ्या रद्द : महामंडळाला फटका
दररोज 80 फेऱ्या रद्द
स्वारगेट स्थानकातून बहुतांशी बसेस कोल्हापूर, सांगली भागात जातात. त्या भागात पुण्यातून दररोज 75 ते 80 फेऱ्या होत असून दररोज 8 ते 10 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून एकही बस सोडली नसल्याने सेवा विस्कळीत झाली आहे.
पुणे – कोल्हापूर आणि सांगलीतील पूर परिस्थिती निर्माण झाल्याने एस.टी. वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुणे शहरातून मागील पाच दिवसात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात जाणाऱ्या सुमारे 400 फेऱ्या रद्द करण्यात आल्याने तब्बल 45 ते 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोल्हापूर, सांगली शहर तसेच ग्रामीण भाग जलमय झाला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग बंद आहेत. कोल्हापूर या ठिकाणी पंचगंगा नदीचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्याने पुणे, मुंबई या शहरांचा कोल्हापूर व सांगली शहराशी पूर्णत: संपर्क तुटला आहे. यामध्ये एस.टी वाहतूक बंद असल्याने प्रवाशांचीही कोंडी झाल्याचे चित्र असून प्रशासनही हतबल आहे.
गेल्या पाच दिवसापासून सांगली, कोल्हापूर भागात एस.टी वाहतूक सेवा बंद आहे. त्यात स्वारगेट स्थानकातून दररोजच्या 80 फेऱ्या रद्द केलेल्या आहेत. यामुळे एस.टी महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
– प्रदीपकुमार कांबळे, आगारप्रमुख, स्वारगेट.