कोल्हापूर(प्रतिनिधी) : सरकारने, राज्य नियोजन मंडळाच्या समितीचे पुनर्गठन केले आहे. या समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविण्यात आली. क्षीरसागर यांना“मंत्री दर्जा” देण्यात आला आहे. मंत्रालय समोरील प्रशासकीय इमारतीमध्ये १८ व्या मजल्यावर समितीचे कार्यालय आहे.
यापूर्वी १७ जून २०१९ रोजी राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदावर क्षीरसागर यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर आजतागायत ते या पदावर कार्यरत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळ वगळता सर्व समित्या सरकारने बरखास्त केल्या होत्या. परंतु, राज्य नियोजन मंडळ सुरूच ठेवले होते.
सरकारने नऊ मार्च २०२१ रोजी आदेशान्वये पुनर्गठन केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदावर क्षीरसागर यांची नियुक्ती कायम ठेवली.
समितीमध्ये उपाध्यक्ष पदावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, समिती सदस्य म्हणून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडव, राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह सरकारी अधिकारी काम पाहतील.