कोल्हापूर : संपूर्ण राज्याचे आज कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडण्याचे भाजपचे स्वप्न आता संपले आहे. कारण या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. तसेच कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.
काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली तर भाजपकडून सत्यजीत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे निकालाची उत्सुकता होती. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी कोल्हापूरच्या जनतेने आपल्याला दिलेला शब्द पाळला असल्याचे म्हटले आहे.
“कोल्हापूरच्या जनेतेने शब्द पाळला आहे. चंद्रकांत जाधव यांच्या नंतर माझी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले. हा विजय माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. चंद्रकांत जाधव यांनी जे पेरले तेच उगवले. मताधिक्य मिळणार याची अपेक्षा होती कारण जनता आमच्यासोबत होती,” अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी दिली.
मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा भागातून मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव २१३७ मतांनी आघाडीवर होत्या. जयश्री जाधव यांना ४८५६ तर भाजपाच्या सत्यजित कदम यांना २७१९ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना ५५१५ तर सत्यजित कदम यांना २५१३ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या फेरीमध्ये जाधव यांना ४९२८ तर सत्यजित कदम यांना २५६६ मते मिळाली आहेत. तिन्ही फेऱ्यानंतर जयश्री जाधव या ७५०१ मतांनी आघाडीवर आहेत.
चौथ्या फेरीनंतर जयश्री जाधव यांना ३७०९ तर सत्यजित कदम यांना ३९३७ मते मिळाली. तर पाचव्या फेरीनंतर कदमवाडी, जाधववाडी,भोसले वाडी या भागातून सत्यजित कदम यांनी आघाडी घेत ४१९८ मते मिळवली आहेत. मात्र पुन्हा सहाव्या फेरीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीत जयश्री जाधव यांनी ४६८९ तर सत्यजित कदम यांनी २९७२ मते मिळवली आहेत.
दहाव्या फेरीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २८६८ तर सत्यजित कदम यांना ३७९४ मते मिळाली आहेत. अकाराव्या फेरीत जाधव यांना २८७० तर कदम यांना २७५६ मते मिळाली आहेत. २० व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी १५ हजार मतांची मोठी आघाडी घेतली आहे. संभाजी नगर, पद्माला, मंगळवार पेठ या भागातील मतपेट्या उघडल्या नंतर जयश्री पाटील यांना ४३६६ तर सत्यजित कदम यांना ३०७४ मते मिळाली आहेत. दरम्यान चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना १८ हजार ८३८ इतके मताधिक्य मिळाले आहे.
या निवडणुकीत काँग्रेससह भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपली ताकद पणाला लावली होती. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही अनेक दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडले होते. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही इथे प्रचार केला होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली.