कोल्हापूर : शहरातील विवाहसह कोणत्याही समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वांची नावे व फोन नंबरची यादी महापालिकेला देणे मंगल कार्यालयांना बंधनकारक केले आहे.
महापालिका प्रशासनाने याची अमलबजावणी करण्याचे आदेश आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना आज दिले आहेत. परवानगी दिल्यानंतर समारंभाच्या दिवशी महापालिकेचे पथक प्रत्यक्ष जागेवर जाऊन व्हिडीओ शुटींग करणार आहे. त्याठिकाणी 50 पेक्षा अधिक लोक उपस्थित असल्यास अथवा प्रशासनाने घालून दिलेल्या नियामांचे उल्लंघन झाल्यास संबंधीत कार्यालय चालकावर व विवाह समारंभ आयोजित करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत आहे. साथ आटोक्यात आणण्यसाठी महापालिकेच्या वतीने युध्द पातळीवर उपाययोजना सुरु आहेत. नियमांची कडक अमलंबजावणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी समारंभांना 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहत असलेचे निदर्शनास आले आहे. यातून संसर्ग झालेल्या घटना पुढे येत आहेत. यामुळेच मंगल कार्यालयांवर समारंभास उपस्थित राहणाऱ्या लोकांची नावे व फोन नंबर घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यालय चालकांवर गुन्हा
महापालिकेच्या वतीने आज रुईकर कॉलनी येथील राजगौरव मंगल कार्यालय येथे विनापरवाना लग्न समारंभ आयोजीत केल्याप्रकरणी संबंधीत कार्यालय मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी शहरातील नागरीकांनी व मंगल कार्यालयांनी कोणताही समारंभ आयोजीत करताना प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.