कोल्हापूर/ प्रतिनिधी – केंद्र सरकारने नव्याने मंडलेल्या कृषी विधेयकाला देशभरातील शेतकरी संघटनांकडून विरोध होत आहे. हे विधेयक मागे घेण्याची मागणी करत आज भारत बंद पुकारण्यात आला आहे.
राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या बिलाची होळी करत बंदला पाठिंबा दिला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ इथल्या त्यांच्या निवासस्थानी या आंदोलनात सहभाग घेत सरकारवर टीका केली.
यावेळी राजू शेट्टींसह इतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या विधेयकाला विरोध केला आहे. दरम्यान, सरकार केलेल्या नव्या कृषी विधेयकावरून देशभरात आज भारत बंद ची हाक देण्यात आली आहे. त्याला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
नव्या कृषी विधेयकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रस्ता रोको केला आहे. अनेक ठिकाणी रेल्वे रुळावरच शेतकऱ्यांनी आंदोलने सुरू केल्याने रेल्वे सेवाही विस्कळीत झाली असून, पंजाब, हरयाणात या विधेयकांविरोधात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचा आक्रमकपणा पाहून दिल्लीत हरयाणा सीमेलगतची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.