कोल्हापूर : सत्तारुढ होताच शासनाने राज्यातील आर्थिकदृष्टया अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करणारी “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना” आणली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील 57 हजार 196 शेतकऱ्यांना 391 कोटी 96 लाख रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस मिळणार आहे, अशी ग्वाही पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिली.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनी पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी डी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छत्रपती शाहू स्टेडियम येथे झालेल्या या ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते.
पालकमंत्री श्री. पाटील यावेळी म्हणाले, परंपरा आणि नवता याचं नातं सागणारा आजचा हा महन्मंगल दिवस आहे. ज्यांच्या त्यागातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या, देशभक्तांच्या, क्रांतीकारकांच्या आणि शहिदांच्या प्रती मी प्रथम आदर व्यक्त करतो आणि आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. पुराच्या काळात बचाव व मदत कार्यात मदत करणाऱ्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो.
पूरपरिस्थितीत कोल्हापूरकरांनी जो संयम आणि धैर्य दाखविले त्यांच्या वृत्तीला मी सलाम करतो. जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना एकूण 321 कोटी 45 लाखाहून अधिक मदत वाटप केली आहे. अद्यापही उर्वरित लाभार्थ्यांना अनुदान वाटप प्रक्रिया सुरु आहे. पूरबाधित लोकांना देय असणारी सर्व मदत विनासायास व तात्काळ देण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
391 कोटी 96 लाख रुपयांची कर्जमाफी पालकमंत्री पुढे म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे 78 हजार 228 हेक्टरवरील तीन लाखांवर शेतकरी बाधीत झाले तर अवकाळी पावसामुळे 1584 हेक्टरवरील 7861 शेतकरी बाधीत झाले आहेत.
या बाधीत शेतकऱ्यांना रोख स्वरुपातील 160 कोटींची मदत तसेच 295 कोटींची मदत कर्जमाफीच्या माध्यमातून सहकार विभागाकडून प्रस्तावित केली आहे. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त कर्ज खात्यात अल्प मुदत पीक कर्जाची 30 सप्टेबर 2019 रोजी मुद्दल व्याजासह थकीत असलेली व परत फेड न झालेली रक्कम 2 लाखापर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना कर्ज मुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
31 मे 2020 पूर्वी या योजनेतील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन खरीप पीक कर्ज वाटप करण्याचे उदि्दष्ट आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकामधील 57 हजार 196 शेतकऱ्यांना 391 कोटी 96 लाख रुपयांची कर्जमुक्ती मिळणार आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. जे शेतकरी अल्पमुदत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करीत असतात अशा शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच नवीन योजना जाहीर करण्याचा शासनाचा मानस आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, महापौर वकील सूरमंजिरी लाटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदीसह स्वातंत्र्य सैनिक त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.