गणेश मंडळांच्या नोंदणीतच अनुत्साह
नगर – गणेशोत्सवाचा मांडव टाकण्यासाठी मनपाची परवानगी आवश्यक असल्याने व अनेक गणेश मंडळांची अजूनही नोंद न झाल्याने मनपातील एक खिडकी योजनेची मुदत दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे.मात्र असे असले तरी यंदा कोल्हापूर -सांगलीतील पूरपरीस्थितीचे सावट गणेशोत्सवावर राहणार आहे.त्यामुळेच मंडळांच्या नोंदणीत अनुत्साह दिसून येत आहे.
गेल्यावर्षी मनपाकडे 351 मंडळांनी नोंदणी केली होती .तर यावेळेस नोंदणीची सुरवात 8ऑगस्टला सुरू करूनही 13 तारखेपर्यंत एकही मंडळाने नोंदणी अर्ज दाखल केला नव्हता.काल नोंदणीची मुदत संपण्याच्या वेळी मात्र परवानगी साठी मंडळांची झुंबड पहायला मिळाली. आणि आता मुदत वाढविल्यानंतर पुन्हा मरगळ आली.उद्या (दि.28) या नोंदणीची मुदत संपणार असून नोंदणीचा आकडा दोनशेच्या घरात पोहोचला आहे. तर धर्मादाय आयुक्तांकडील नोंदणीची अवस्थाही तशीच आहे.काल (दि.26 )अखेर या कार्यालयातही 185 मंडळांची नोंदणी करण्यात आली होती.
यंदा मंडप उभारणीच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोर होणार
यंदा मंडप उभारणीच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोररीतीने करणार असल्याचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले आहे. 2015 सालापासून न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावली नुसार नियम तयार करण्यात आले आहेत. त्यानियमावलीचा भंग केल्या बद्दल गेल्यावर्षी चार मंडळांवर कारवाई म्हणून यंदा या चार मंडळांना परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यात आडते बाजारचौक ,मंग़लगेट पोलीस चौकीजवळचे मंडळ जनजागृती मित्रमंडळ आणि नेता सुभाष या मंडळांचा समावेश आहे. विनापरवानगी मंडप उभारणीचा तहसिलदारांच्या समितीचा आल्याने या मंडळांवर कारवाई करणे भाग पडल्याचे अतिक्रमण विरोधी विभाग प्रमुखांनी सांगितले.