कोल्हापूर (प्रतिनिधी) – अवकाळी मुसळधार पावसामुळे पोल्ट्रीची भिंत कोसळून कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथील तिघे जण जागीच ठार झाले. मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. पावसापासून बचावण्यासाठी भिंतीचा आडोसा घेतला असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे. गिरिजा संदीप कांबळे, अजित अर्जुन कांबळे, संगीता कांबळे अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कांबळे कुटुंबियांकडून पोल्ट्रीचे खत जमा करून ते गावोगावी विक्रीचा व्यवसाय केला जातो. आज सकाळी हरळी (ता. गडहिंग्लज) येथे पोल्ट्रीचे खत भरण्यासाठी सर्वजण गेले होते.
चारचाकी वाहनातून इतर तिघेजण गावी नांगनूरला परतले. तर गिरीजा, अजित व संगीता दुचाकीवरून नांगनूरकडे जात होते. दरम्यान, मुगळी येथे जोरदार पाऊस आला. त्यामुळे मुगळी रोडवरील शंकर माने यांच्या पोल्ट्रीच्या भिंतीला पावसापासून आडोसा म्हणून ते उभा राहिले होते.
यावेळी अचानक पोल्ट्रीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत