पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे
कोल्हापूर (प्रतिनिधी) – गेल्या 5 दिवसंपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरला पुन्हा एकदा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी धोका पातळीकडे वाटचाल करत असून ती सध्या 39 फूट 9 इंच इतकी झाली आहे. पंचगंगेची धोका पातळी ही 43 फूट असून लवकरच नदी या पातळीकडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील 68 बंधारे पाण्याखाली गेले असून मागच्या 24 तासांत तब्बल 335.57 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अद्याप उघडेच असून नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आहे.
तीन दिवसापासून बंद असणारे गगनबावडा आणि आजरा येथील मार्ग सुरू; अद्यापही 9 राज्यमार्ग व 15 प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद गेल्या तीन दिवसांपासून बंद असणारे गगनबावडा तालुक्यातील शेनवडे,आंदूर,धुंदवडे,चौधरवाडी, म्हासुर्ली,कोते,चांदे-राशिवडे,बु. परिते प्रजिमा क्र. 34 आणि आजरा तालुक्यातील नवले,देवकाडगाव,साळगाव प्रजिमा.क्र. 58 या मार्गावरील वाहतूक आज सकाळपासून सुरू झाली आहे. अद्यापही 9 राज्यमार्ग व 15 प्रमुख जिल्हा मार्गावरील वाहतूक बंद आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी दिली.
शिरोळमधील 4 गावातून 112 तर करवीर मधील दोन गावातून 259 कुटुंबांचे स्थलांतर
खबरदारीचा उपाय म्हणून आज अखेर शिरोळमधील चार गावातील 112 कुटुंबातील 460 व्यक्तींचे तर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीमधील 250 कुटुंबातील 390 आणि कोल्हापूर शहरातील 9 कुटुंबातील 28 जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील गोठणपूर (कुरुंदवाड) मधील 19, राजापूरमधील 48, राजापूरवाडीमधील 18 व खिद्रापूरमधील 27 अशा 4 गावातून 112 कुटुंबातील 460 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील धरणांमधून क्युसेकमधील विसर्ग पुढीलप्रमाणे
तुळशी 1011, वारणा 13368, दूधगंगा 5400, कासारी 1100, पाटगाव 1412, कुंभी 350