मुंबई – ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर येत्या ऑक्टोबरमध्ये जाणारा भारतीय क्रिकेट संघ दोन आठवडे विलगीकरण कक्षात राहणार असल्याचे संकेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी दिले. या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धाही होणार आहे.
करोनामुळे जगभरात हाहाकार सुरु असताना विश्वकरंडक स्पर्धा होणार का असा प्रश्न पडला असला तरी त्यानंतरची मालिका मात्र होणार असेही धुमाळ यांनी सांगितले आहे. करोनामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला प्रचंड तोटा झालेला असून भारतीय संघाविरुद्धची मालिका झाली तरच हा तोटा भरून निघेल याची खात्री असल्यानेच हा दौरा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मंडळाने करोनामुळे झालेल्या नुकसानातून मार्ग काढण्यासाठी मोठी कामगार कपात केली आहे. भारताविरुद्धची मालिका रद्द झाली तर मात्र, त्यांच्या मंडळावर दिवाळखोरीची वेळ येण्याची शक्यता आहे.
उलट परदेशात प्रवास केल्याने लॉकडाऊनच्या नियमाची अंमलबजावणी केली तरी हरकत नाही असे स्पष्ट करत भारतीय मंडळाने तिथे मालिकेपूर्वी विलगीकरणात राहण्याचीही तयारी दर्शवली आहे.
एक हात दे, एक हात ले….
ही मालिका होणार का, विश्वकरंडक होणार का असे प्रश्न निर्माण झालेले असले तरीही त्यामागे भारतीय मंडळाचा आयपीएल स्पर्धेसाठीचा अट्टाहासही कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. करोनाचा धोका समोर ठेवत टी-20 विश्वकरंडक पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकायचा व त्या काळात मिळालेल्या विंडोमध्ये आयपीएल स्पर्धा खेळवायची व तरच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळायची असे नियोजन भारतीय मंडळाचे असल्याचे बोलले जात आहे म्हणजेच एक हात दे, एक हात ले असे दर्शवत आयपीएलच्या बदल्यात दौरा करण्याची तयारी दाखवली जात आहे, असेही मंडळाच्या एका सूत्राने सांगितले.