नवी दिल्ली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी शास्त्रीच योग्य असल्याचे मत मांडले होते. यावर प्रशिक्षक निवडीबाबत भारताचा कर्णधार विराट कोहली यास आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया माजी कर्णधार सौरव गांगुली याने दिली आहे.
सौरभ गांगुली म्हणाला की, ‘प्रशिक्षक निवडीबाबत भारताचा कर्णधार विराट कोहली यास आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. संघाची सूत्रे सांभाळताना कर्णधाराला नेहमीच प्रशिक्षकाची मदत घ्यावी लागते. त्यामुळेच कोहलीने रवी शास्त्री यांचीच पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे.’
दरम्यान, भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यापूर्वी कोहली याने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून मी सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचीच शिफारस करीन असे भारताचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले. मात्र याबाबतचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळानि नियुक्त केलेली समितीच घेईल असेही त्याने मत व्यक्त केले होते.