पुणे – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे यांच्या पावलावर पाऊल ठेवत कसोटी व एकदिवसीय कारकीर्द लांबवण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही टी-20 प्रकारातून निवृत्ती जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर कोहली हा धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती बीसीसीआयच्या एका सदस्याने दिली आहे.
कोहलीने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्याने आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाचेही नेतृत्वही सोडणार असल्याचेही कोहलीने जाहीर केले होते.
या पाठोपाठ घेतलेल्या दोन धक्कादायक निर्णयानंतर कोहली आता क्रिकेटच्या या वेगवान प्रकारातूनही निवृत्ती घोषित करणार आहे. 2016 सालापासून भारताच्या संघाचे क्रिकेटच्या तीनही प्रकाराचे नेतृत्व करत आहे. तर 2013 सालापासून तो आरसीबीचा कर्णधार आहे. आपली कारकीर्द लांबवण्यासाठी तो हा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
आयपीएल खेळतच राहणार
सचिन, कुंबळे, द्रविड व लक्ष्मण या फलंदाजांनीही असाच निर्णय घेत टी-20 मधून स्वतःला दूर केले होते. कोहली पुढील काळात आयपीएल खेळत राहील मात्र, आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांतून मात्र तो निवृत्ती घेइल, असेही सांगितले जात आहे. यापूर्वीही कोहलीने अनेकदा काही टी-20 सामन्यांतून विश्रांती घेतली होती व त्यावेळी हिटमॅन रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले होते.