नवी दिल्ली – विराट कोहली एक फलंदाज म्हणून निश्चितच महान आहे. मात्र, संघाचे कर्णधारपद त्याच्याकडे पुढील काळात नसेल. त्याच्या जागी लोकेश राहुलकडे ही जबाबदारी सोपविली जाणार, असा दावा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू गौतम गंभीर याने केला आहे.
कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ चांगली कामगिरी करत असला तरीही काही वळा कोहलीने घेतलेले निर्णय अनाकलनीय ठरले आहेत. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतही त्याने अंबाती रायडूसाठी आग्रह धरण्याऐवजी विजय शंकरच्या नावाची शिफारस का केली हे आजही एक कोडेच आहे. भारतीय संघाची मधल्या फळीतील फलंदाजी बलाढ्य नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यासाठी निवड समितीने केवळ कोहलीच्या मताला प्रधान्य देण्यापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे. सध्यातरी त्याच्या जागी राहुलच योग्य वाटतो, असेही गंभीर म्हणाला.
आयपीएल संपल्यावर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जात आहे. या मालिकेसाठी जरी कोहलीकडे नेतृत्व कायम राहिले तरीही त्यानंतरच्या मालिकांसाठी राहुलकडे ही जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्याकडे नेतृत्वगुण आहेत व त्याला योग्यवेळी संधी दिली तरच त्याचा संघाला फायदा होइल, असे मतही त्याने व्यक्त केले.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत राहुलने किंग्ज इलेव्ह पंजाबचे नेतृत्व करताना आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. अर्थात त्याला जर कोहलीची जागा घ्यायची असेल तर त्याला केवळ टी-20 सामन्यांतच नव्हे तर एकदिवसीय व कसोटी सामन्यातही सरस व सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल, असेही गंभीरने सांगितले.