मुंबई: भारताचा कर्णधार विराट कोहली याने बुधवारी घणाघाती अर्धशतकी खेळी करून माजी अष्टपैलू युवराजसिंगच्या कामगिरीला मागे टाकले. एकाच टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार फटकावणारा कोहली पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. युवराजच्या नावावर ही कामगिरी होती. 2007 साली झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत युवराजने सर्वाधिक 12 षटकार फटकावले होते.
वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका भारताने मोठ्या दिमाखात जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुलच्या स्फोटक फलंदाजीचा मोठा वाटा होता. विराटने आपल्या धमाकेदार खेळीत युवराज सिंगचा 12 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. विराटने वेस्ट इंडिजविरुद्धच्या बुधवारी झालेल्या निर्णायक टी-20 सामन्यात 13 षटकारांची नोंद केली. कोहलीने केवळ 29 चेंडूत 70 धावा फटकावल्या. आपल्या खेळीत त्याने सात षटकार आणि चार चौकार लगावले. विराटने या मालिकेत एकूण 13 षटकार लगावले.
राहुलची क्रमवारीत झेप
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिका भारतीय संघाने जिंकली. भारताचा सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलला त्याच्या 91 धावांच्या खेळीचा लाभ क्रमवारीतील स्थान उंचावण्यासाठी झाला असून त्याने 6 व्या स्थानी झेप घेतली आहे. आंकरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने गुरुवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी स्थान उंचावले आहे.
दोन महिन्यांनंतर कोहलीने क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळवले आहे. कोहली पहिल्या 10 खेळाडूंत दाखल झाला आहे. याआधी कोहली 15 व्या स्थानावर होता. मात्र, आता विराट टॉप-10 मध्ये आला आहे. राहुल 6 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर, रोहित शर्मा 9 व्या स्थानावर आहे.