गुवाहाटी : श्रीलंकेविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी पावासामुळे रद्द झाला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम मागे टाकण्याची संधी होती, मात्र सामना होऊ शकला नसल्याने आता कोहलीला मंगळवारी इंदूरला होत असलेल्या दुसऱ्या सामन्यात ही संधी मिळणार आहे.
या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे टी-20 मध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनण्याची कोहलीला संधी
मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाच होणाऱ्या टी -20 विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.
या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये टी -20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळल्या जातील. आंतरराष्ट्रीय टी -20 मध्ये सध्या कोहली आणि रोहित सर्वाधिक धावा करणारे फलंदाज आहेत.
आता कोहली व रोहित धावांच्या बरोबरीवर आहेत. कोहलीने 75 सामन्यांत 2633 धावा केल्या आहेत तर रोहितने 104 सामन्यात 2633 धावा केल्या आहेत. त्यामुळे या मालिकेत कोहलीने एक धाव घेतली की तो रोहितला
मागे टाकेल.
कोहलीचेच आव्हान
भारत आणि श्रीलंकेदरम्यानच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत भारतीय कर्णधार विराट कोहलीला कसे रोखायचे हेच आव्हान श्रीलंका संघासमोर आहे. आतंरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध कोहलीने कायमच सरस खेळी केल्या आहेत. तब्बल 22 महिन्यानंतर भारत आणि श्रीलंका संघ परस्परांशी टी-20 सामना खेळत आहेत.
कोहलीने श्रीलंकेविरुद्ध चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. या चारही सामन्यांमध्ये कोहलीने अर्धशतक केले आहे. कोहलीने चारही सामने मिळून 283 धावा केल्या आहेत. यात एक डावात त्याने नाबाद खेळी केली आहे. अर्थात हे चारही सामने भारता बाहेर झाले आहेत. मायदेशात भारत व श्रीलंका प्रथमच टी-20 लढत खेळणार आहेत. दोन सामने श्रीलंकेत तर दोन बांगलादेशात झाले आहेत. या दोन संघात आतापर्यंत एकूण 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. भारताने 11 तर, श्रीलंकेने पाच सामने जिंकले आहेत.