चेन्नई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला जागतिक क्रिकेटमध्ये रनमशीन म्हणून संबोधले जात असले तरीही 2020 हे साल त्याच्यासह संपूर्ण भारतीय संघासाठी अपयशी ठरले. या संपूर्ण वर्षांत कोहलीला 31 डावात एकही शतक फटकावता आलेले नाही.
कोहलीने पदार्पण केल्यापासून गेल्या दहा वर्षात अनेक विक्रम केले आहेत. मात्र, गेल्या 14 महिन्यापासून विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आलेली नाही. वर्षभरापासून कोहलीला एकही शतक झळकावता आलेले नाही.
चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 48 चेंडूचा सामना करताना कोहलीला केवळ 11 धावाच करता आल्या. गेल्या सातही कसोटी डावांत कोहली अपयशी ठरला आहे. सात डावांत कोहलीला 18 च्या सर्वसामान्य सरासरीने केवळ 127 धावाच करता आल्या आहेत.
2020 मध्ये कोहली पूर्णपणे अपयशी ठरला आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील 23 सामन्यातील 25 डावांत फलंदाजी करताना 35. 54 च्या सरासरीने 835 धावा केल्या आहे. कोहलीने सात अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, कोहलीला 2020 मध्ये एकही शतक झळकावता आलेले नाही. 2020 साली 14 वेळा कोहली तिशीत बाद झाला आहे. कोहलीने अखेरचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरोधात झळकावले होते.