मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला देशाच्या सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करण्याचा विक्रम आपल्या नावावर जमा करण्याची संधी मिळणार आहे. भारत व न्यूझीलंड यांच्यात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत येत्या 18 ते 22 जून या कालावधीत होत असून, याच सामन्यात नाणेफेकीला मैदानात उतरल्यावर ही अनोखी कामगिरी कोहलीच्या नावावर जमा होईल.
माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी व कोहली यांच्यात 60 सामन्यांतील नेतृत्वाची कामगिरी जमा आहे. कोहलीला हा विक्रम इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतच करण्याची संधी होती. मात्र, त्याने पॅटर्नीटी रजा घेतल्यामुळे ही संधी हुकली होती.
कोहली 2014 सालापासून भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभळत आहे. तेव्हापासून गेल्या 8 वर्षांमध्ये 60 कसोटींमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्याने 60 पैकी 36 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे, तर 14 पराभवांचा सामना केला आहे. 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. धोनीने 60 पैकी 27 सामन्यात संघाला विजय मिळवून दिला आहे. जागतिक स्तरावर यशस्वी कर्णधारांच्या यादीत कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ अव्वल क्रमांकावर आहे. स्मिथने 109 पैकी 53 सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला आहे.
त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉन्टिंग आणि स्टीव्ह वॉ आहेत. पॉन्टिंगने 48 तर वॉने 41 कसोटींमध्ये ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला, तर यानंतर वेस्ट इंडीजचे दिग्गज खेळाडू क्लाइव्ह लॉइड यांनी 74 पैकी 36 सामन्यांत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली आहे.