220 जुळ्या भावंडांनी केला आहे विश्वविक्रम
थिरुवनंतपुरम – विविधता आणि सांस्कृतिक वैशिष्ट्ये या निकषांवर विचार केल्यास भारतात आजही अनेक गावे आपल्या आगळ्या-वेगळ्या वैशिष्ट्यांनी जगात प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकी एक गाव आहे केरळच्या मालापुरम जिल्ह्यातील कोदिनी हे गाव. या गावात दोन हजार कुटुंबे असून त्यामध्ये 220 जोड्या जुळ्या मुला-मुलींच्या आहेत. हा एक प्रकारचा जगावेगळा विश्वविक्रम असून अनेक डॉक्टर्स याविषयी संशोधन करताना दिसत आहेत. स्थानिक डॉक्टर कृष्णन श्रीबिजू हे गेल्या दोन वर्षांपासून कोदिनीच्या या वैद्यकीय चमत्काराचा अभ्यास करीत आहेत.
कागदोपत्री या गावात 220 जोड्या जुळ्या मुलांच्या म्हणून नोंदल्या गेल्या असल्या तरी प्रत्यक्षात ही संख्या 300 ते 350 जोड्या इतकी असल्याची शक्यताही डॉ. श्रीबिजू व्यक्त करतात. गेल्या दहा वर्षात मला कोदिनीमधील जुळ्या मुलांची संख्या दुप्पट झाली आहे, असेही ते सांगतात. कोदिनीमधील जुन्या-जाणत्या ग्रामस्थांच्या मते, अशा प्रकारे जुळी मुले मोठ्या संख्येने जन्माला येण्याचा प्रकार तीन पिढ्यांपूर्वी सुरू झाला आहे. म्हणजे साधारण साठ वर्षांपासून आजवर अव्याहतपणे या गावात जुळी मुले जन्माला येत आहेत.
सविस्तर बायोमेडिकल विश्लेषण आणि प्रयोग केल्याशिवाय जुळी मुले सातत्याने जन्माला येण्याचे कारण काय आहे, हे कोणीच निश्चितपणे सांगू शकत नाही, परंतु मला असे वाटते की गावकरी काय खातात आणि काय पितो, हेही पहाणे गरजेचे आहे. तसेच जुळ्या मुलांसाठी बरीच कारणे आहेत, परंतु कोडिनिचे मूलभूत वेगळेपण समजून घेण्यासाठी व्यापक प्रमाणावरील संशोधनाची गरज आहे. प्रत्येक एक हजार जन्मणाऱ्या अर्भकांमध्ये 45 जुळी अर्भके इथे जन्माला येतात. जगात हजारात चारच जुळी मुले जन्मतात. म्हणजे इथे हे प्रमाण दहा पटींपेक्षा अधिक आहे.
पलानी भास्करन नामक पन्नास वर्षीय ग्रामस्थाने ट्वीन ऍण्ड किन असोसिएशन (टका) या संस्थेची स्थापना केली असून ते जुळ्या मुलांच्या जन्माविषयीची आणि अन्य सारी नोंद ठेवतात. त्यांनाही जुळे मुलगे आहेत. गावातील 220 जुळी भावंडं आणि त्यांचे पालक मिळून या संस्थेची सदस्यसंख्या 600 पेक्षा अधिक आहे.