“मी चार वाजता उठणार…’ “मी तर तीन वाजताच…’ मी असं करतो, थोडावेळ अजून जागतो, रात्रीच एक दीड वाजता पहिला सुतळी बॉम्ब लावतो आणि झोपून जातो, म्हणजे मग माझाच पहिला नंबर लागेल…’ माझ्या चुलत भावाचे हे बोलणे ऐकून आम्ही सगळ्यांनी, “ए ही चीटिंग आहे, असे अज्जीबात नाही चालणार…’ असं म्हणत त्याचा डाव हाणून पाडला.
आत्ताच्या प्रत्येक दिवाळीत हे सगळे संवाद जसेच्या तसे आठवतातच. ही जवळजवळ तीसेक वर्षांपूर्वीची, माया, प्रेम, आनंद ह्याने परिपूर्ण अशी, भरपूर मजेत घालवलेली प्रत्येक दिवाळी, डोळ्यांसमोरून तरळून जाते दिवाळी, दिव्यांचा सण, प्रकाशाचा, आनंदाचा, नात्यांचा उत्सव.
एरवी आईने सकाळी शाळेकरिता किंवा क्लासला जाण्यासाठी लवकर उठवल्यावर, “उठतेच गं पाच मिनिटांत’ असं म्हणून त्रास देणारी आम्ही सगळीच मुलं दिवाळीच्या पहिल्या दिवशी एका हाकेतच टुणकन उठायचो. थंडीचे दिवस, त्यात दिवाळी, आवडता सण मग काय? सकाळचे सगळे आवरून झाले की बाजूला रांगोळी काढलेल्या पाटावर बसून आईच्या हातून सुगंधी तेल लावून, नंतर उटणे आणि मोती साबणाने केलेले ते अभ्यंगस्नान अभूतपूर्व सुंदर असायचे. उटणं व मोती साबण लावून केलेल्या स्नानानंतर आपण उगाचच उजळलो, गोरे-बिरे झालो आहोत असे वाटायचे.
आदल्या दिवशीच सगळ्या फटाक्यांची वडिलांनी भावंडांत वाटणी केलेली असायची. मला फुलबाज्या, भुईचक्र, झाड, छोट्या लवंगी माळा, साप, हे असले फटाके असायचे, आणि मोठ्या भावाला लक्ष्मी बॉम, सुतळी बॉम, मोठी लवंगी हजारची माळ आणि बाण असे फटाके असायचे.
आम्ही चुलत भावंडं तेव्हा ना, छोटेछोटे आकाशकंदील बनवायचो घरीच. त्यासाठी दुपारी काकूकडे आम्ही सगळे एकत्र जमायचो. कार्डबोर्ड पेपर, रंगीत कागद, त्याच्या करंज्या, गम, चांदीचा कागद असा पसारा आणि एक एक करत तयार होणारे सुबक उटुकले आकाशकंदील. आपण बनवलेली कुठलीही गोष्ट किती आनंदाची असते, हे तेव्हापासूनच आम्हाला उमगले होते.
आमच्या सोसायटीत मुलींच्या प्रमाणात मुलेच जास्त होती. मी त्यांच्या सोबतीने किल्ला करायला त्यांना मदत करायचे. सगळीकडेच चाळीच्या जागी सोसायट्या उभ्या राहिल्याने लाल माती आणायला गावाबाहेर एक टेकडी होती तिथे आम्ही सगळी मुलं पोती वगैरे घेऊन जायचो.
सगळ्यांच्या सायकली काढून प्रत्येकाच्या मागे एक-एक असे करत आम्ही मजेने हे माती आणायचे काम करायचो. सोसायटीतील एक कोपरा बघून दुपारी सगळे आटोपले की किल्ला करायला सुरुवात करायचो. प्रत्येक जण तेव्हा इंजिनिअर व्ह्यायचा आणि प्रत्येक डोक्यातून काय काय सुपीक कल्पना निघायच्या. किल्ल्याच्या पायऱ्या, छोटंसं कारंजं, त्यावर पेरली जाणारी मोहरी, शिवाजी महाराज आणि मावळे असा सजायचा आमचा किल्ला. पहिल्या दिवशी अभ्यंगस्नान वगैरे उरकून, आईने दिलेला अत्तराचा कापसाचा बोळा कानात अडकवून नवीन कपडे घालून फटाके वगैरे उडवून झाले की सगळे मिळून जायचो गणपतीच्या देवळात.
देवळात आणि रस्त्या-रस्त्यांवर काढलेल्या रांगोळ्या, फटाक्यांची आतषबाजी बघत, नवीन नवीन कपडे घातलेली तरुण मुलं मुली असा प्रत्येक रस्ता सजलेला असायचा. देवाचे दर्शन घेऊन झाले की आम्ही सगळी चुलत भावंडे एकेका नातेवाईकांच्या घरी मोठ्या माणसांचा आशीर्वाद घ्यायला आणि फराळाला जायचो. एका ताटात चिवडा, एका ताटात रव्याचे बेसनाचे लाडू, करंज्या, चकल्या, कडबोळी, शंकरपाळे आणि शेव असे असायचे, त्यावर ताव मारून झाला की आशीर्वाद घेऊन आपापल्या घरी जायचो. तेव्हा ना गिफ्ट्स वगैरेचे फॅड नव्हते, पण नुसत्या आपल्या माणसाची गाठभेटही कुठल्याही मौल्यवान भेटीपेक्षा अमूल्य असायची.
दुपारी जेवणे आटोपली की आमच्या मजल्यावरच्या आम्ही सगळ्या मुली आणि काकू गेरू सारवून मोठमोठ्या रांगोळ्या काढायचो. इतकी मोठी रांगोळी असायची की, संध्याकाळ होऊन डास चावायला लागायचे आणि आई ओरडायची, “इतकी मोठी कशाला रांगोळी घेतली काढायला, आता दिवेलागणीची वेळ झाली, बास करा…’ पण आम्ही काही जुमानायचो नाही आईला. परत दोन दिवसांनी तशीच मोठी रांगोळी काढायचो. आमचे तळमजल्यावर, त्यामुळे रांगोळी काढून झाली की, चौथ्या मजल्यापासून सुरुवात करत तळमजल्यावर येऊन आपलीच रांगोळी किती छान दिसते आहे, ह्यात धन्यता मानायचो.
समाधान, आनंद, आशीर्वाद आणि भरपूर धमाल करत हे दिवाळीचे चार दिवस भुर्रकन उडून जायचे. आवारात पडलेला फटाक्यांच्या कागदांचा खच, हळूहळू माती वाळत असलेला कोपऱ्यातील किल्ला, घमघमणारा घरातील अत्तराचा मुरलेला वास, मोहरी आणि मीठ साखर खाली बसलेला चिवड्याचा डबा आणि कपाटात जपून ठेवलेले नवीन कपडे हे सगळं साठवणींत ठेवत हे आनंदाच्या आठवणींचे गाठोडे वर्षभर पुरवायचे असते; परत येणाऱ्या दिवाळीच्या आगमनाच्या प्रतीक्षेत.
– मानसी चाफेकर