KKR vs PBKS match washed out due to rain in IPL 2025 : आयपीएल २०२५ मध्ये केकेआर आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना कोणत्याही निकालाशिवाय रद्द करण्यात आला. कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने यजमान नाईट कोलकात्यासमोर २०२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात केकेआरचा डाव सुरू होताच पावसाने व्यत्यय आणला आणि सुमारे दीड तास वाट पाहिल्यानंतर अखेर पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला.
या हंगामात सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निकालामुळे कोलकाताच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडन गार्डन्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पुन्हा एकदा चाहत्यांची कमतरता भासली आणि स्टेडियम पूर्णपणे भरले नाही. या हंगामातही हे दृश्य आधी दिसले होते. अशा परिस्थितीत, कोलकात्याला चाहत्यांकडून अपेक्षित असलेला पाठिंबा मिळाला नाही. प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामी जोडीने आलेल्या प्रेक्षकांना शांत बसण्यास भाग पाडले. या हंगामात, या दोन युवा सलामीवीरांनी पंजाबला वेगवान सुरुवात दिली होती आणि पुन्हा एकदा तेच घडले.
Match 4⃣4⃣ between @KKRiders and @PunjabKingsIPL has been called off due to rain 🌧️
Both teams share a point each! #TATAIPL | #KKRvPBKS pic.twitter.com/mEX2eETWgh
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2025
प्रियांश-प्रभसिमरनची स्फोटक फलंदाजीचा दिसला जलवा –
पहिल्याच हंगामात खेळणाऱ्या प्रियांश आर्यने (६९ धावा) पुन्हा एकदा स्फोटक फलंदाजी सुरू केली आणि संघाच्या धावसंख्येला गती दिली. त्याने प्रभसिमरनसोबत पॉवरप्लेमध्ये संघासाठी अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर वेग थोडा मंदावला पण १० व्या षटकापासून दोघांनीही पुन्हा आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. प्रियांशने फक्त २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या हंगामात त्याने दुसऱ्यांदा ५० धावांचा टप्पा ओलांडला. दुसरीकडे, प्रभसिमरन सिंगनेही शानदार अर्धशतक झळकावले. प्रियांश बाद झाला तेव्हा ११.५ षटकांत दोघांमध्ये १२० धावांची भागीदारी झाली. यानंतर प्रभसिमरनने आक्रमण करत ८३ धावांची शानदार खेळी खेळली. ज्यामुळे पंजाबने २० षटकांत २०१ धावा केल्या.
हेही वाचा – CSK vs SRH : ‘RCB प्रमाणे आम्हीही…’, प्लेऑफमध्ये पोहोचण्याबाबत नितीश रेड्डीने व्यक्त केला विश्वास
केकेआरसाठी प्लेऑफचा रस्ता झाला कठीण –
प्रत्युत्तरादाखल, कोलकाताच्या डावातील पहिले षटक नुकतेच संपले होते. तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला. हा पाऊस एकदा सुरू झाला आणि नंतर थांबला नाही. अखेर रात्री ११ वाजता पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच यामुळे दोन्ही संघांना गुण वाटून घ्यावे लागले. याचा फायदा पंजाब किंग्जला झाला आणि संघ ११ गुणांसह पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला. पण कोलकाता अजूनही ७ गुणांसह ७ व्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत आधीच मागे असलेल्या गतविजेत्या केकेआरला आता उर्वरित सर्व ५ सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकावे लागतील, त्यानंतरच संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल.