जर जेवणात मीठ कमी पडलं तर वरून घालता येतं. पण जर जेवणात मीठ जास्त झालं तर प्रश्नच निर्माण होतो. अशा वेळी जर रस्सा भाजी असेल तर त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल आणि भाजीमध्ये काही बदल होणार नाही. पण हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या की, थोड्या वेळाने कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढा. जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त पडलं, तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता. त्यामुळे भाजीचा खारटपणा कमी होईल.
जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी दूध गरम करून घ्या. त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 10 ते 12 तास झाकून ठेवा. मस्त सायीचं दही लागेल.
कधी जेवणांमध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही. अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी कुटून किंवा किसून घालावा. असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो.
खूप महिलांची अशी तक्रार असते की, भात मोकळा होत नाही. शिजल्यावर भात एकदम गच्च होतो. जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांड्यात शिजवा. जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं. यामुळे भात मोकऴा होईल.
अनेकदा आपण अगोदरच कोशिंबीर बनवून ठेवतो, पण ती बरेचदा आंबट होते. हे टाळण्यासाठी दह्यांमध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका. कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही.
बरेचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येते किंवा पराठा तुटतो. असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणीक मळताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रेशर द्यावे. कडेला नाही. यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि पराठा फाटणार नाही.
आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थाला चांगलाच झणका येतो. त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते. जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसांसाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं. यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही.
जर अंडी उकडताना फुटत असल्यास काळजी करू नका. अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावीत. मग अंडी छान उकडली जातील.
काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होतं आणि धार कमी होते. हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या. यामुळे ब्लेडची धार चांगली होईल.